Majjacha Adda with Ashok Saraf : मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन काणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. गेली पाच दशके त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेविश्वातही त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यामुळे त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी त्यांच्या नाटकाचा एक किस्सा सांगितला.
यावेळी त्यांना “तुमच्या एखाद्या विनोदावर कधी प्रेक्षक हसले नाहीत, असं कधी झालं आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यांचे उत्तर देताना अशोक सराफ यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला. यावेळी ते असं म्हणाले की, “नांदेडला आम्ही ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाचा प्रयोग करत होतो. तिथल्या एका कंत्राटदाराने त्या नाटकाचा प्रयोग घेतला होता. हे नाटक एकदम विनोदी होतं. नाटकाच्या पहिल्या ओळीपासून ते अगदी शेवटच्या ओळीपर्यंत नाटकात प्रत्येक ठिकाणी विनोद होता. पण तिथला एकही माणूस हसत नव्हता.”
यावर हे प्रेक्षक हसत का नाहीत असा प्रश्न अशोक सराफ यांच्यासह सर्वांनाच पडला. इतके विनोदी नाटक असूनही एकही प्रसखक त्यावर हसत नव्हता किंवा त्यांना दाद देत नव्हता. त्यामुळे सगळ्यांनाचं चिंता वाटू लागली. यावर नाटकातल्या एकाने त्यांना “हे लोक हसत का नाही आहेत? त्यांना ऐकू येत नाही की काही कळत नाही आहे?” असं विचारलं. पण हे नाटक तिथल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी ज्या कंत्राटदाराने घेतले होते, तो तिथला गुंड किंवा मोठा दादा होता. यावर त्या कंत्राटदाराने म्हटले. “ते काय हसतील? एकेकाला सांगून ठेवलं आहे. खबरदार कुणी हसलात तर” अशोक सराफ यांनी सांगितलेल्या किस्स्यावर एकच हशा पिकला.
दरम्यान, त्या कंत्राटदाराच्या सांगण्यावरून नाटक बघायला आलेल्या प्रेक्षकांपैकी कुणीही हसले नव्हते. त्यामुळे आपल्या प्रत्येक विनोदाने प्रेक्षकांना हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांच्या त्या विनोदी नाटकाला एकही प्रेक्षक हसला नसल्याचा प्रसंग सराफ यांच्याबरोबरही घडला आहे हे खूपच आश्चर्यचकित करणारे होते.