ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या आशयघन अभिनयामुळे जितके चर्चेत राहत असतात, तितकेच ते त्यांच्या रोखठोक भूमिकांमुळे ओळखले जातात. सरकार कोणाचंही असो, नानांनी कायमच त्यांना पटण्याऱ्या गोष्टींबद्दल आपले मत व्यकात केले आहे. गेले काही दिवस दिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांसंबंधित सुरू असलेल्या या प्रकरणात आता नानांचीही एन्ट्री झाली आहे.
नानांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारकडे काहीही मागू नका, तर कुठलं सरकार करायचं हे ठरवा, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. नाशिकमधील शेतकरी संमेलनामध्ये नानांनी सरकारच्या शेतकऱ्यांबद्दलच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
यावेळी नानांनी त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत असं म्हटलं की, “सरकारकडे मागू नका. कुठले सरकार करायचे हे ठरवा. मला राजकारणामध्ये जाता येत नाही, कारण माझ्या पोटात आहे तेच ओठावर येतं. दुसऱ्या दिवशी मला त्या पक्षातून काढतील. माझ्या अशा वागण्यामुळे महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील मग तिथे कशाला जायचं?”
आणखी वाचा – “सगळेच नशा करत असल्याचं तिने…”, इमरान हाश्मीने कंगना रणौतला चांगलंच सुनावलं, म्हणाला, “ती एवढी आक्रमक…”
यापुढे त्यांनी सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या भूमिकेबद्दल आपले मत व्यक्त करताना असं म्हटल की, “यांना (राजकारण्यांना) कधी कळणार आहे की आपण मरणार आहोत?, किती संचय करायचा?, मृत्यू अटळ आहे हे माहीत नाही का तुम्हाला?, अमर असल्यासारखे तुम्ही का वागता आणि का बोलता?, कुठले नवीन आदर्श ठेवता तुम्ही नवीन पिढीसमोर?, काय चाललं आहे? रोज आम्हाला अन्न देणारा आहे त्याची जर तुम्हाला पत्रास (कदर) नसेल तर आम्ही तुमची पत्रास या ठेवयाची?
दरम्यान, नाशिक शहराजवळील मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स येथे सोमवारपासून दोन दिवसीय अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनास सुरुवात झाली. या संमेलनाचे उद्घाटक नाना पाटेकर तर, ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे हे संमेलनाध्यक्ष आहेत.