Majjacha Adda with Ashok Saraf : मालिका या प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. नित्यनियमित कोणताही खंड पडू न देता हे प्रेक्षक मालिका पाहणं पसंत करतात. मालिकेच्या कलाकारांनी या प्रेक्षकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. शिवाय बऱ्याच मालिकांचे कलाकारही चाहते असतात. अशातच एका दिग्गज कलाकाराने मालिका पाहत नाही, मला मालिका पाहण्याची भीती वाटते असं केलेले वक्तव्य चर्चेत आलं आहे. हे अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार आहेत अशोक सराफ.
अशोक सराफ यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तुम्ही मालिका पाहता का? निवेदिता ताईंची मालिका तुम्हाला आवडते का? असा प्रश्न विचारला असता, अशोक सराफ म्हणाले, “मालिका, चित्रपट किंवा कॉमेडी शो बघून मी आनंदी राहत नाही. कारण मी जे करत आहे तेच इतर लोक करत आहेत. माझंच काम इतर कलाकार दाखवत आहेत. सगळे कॉमेडी दाखवतात तर त्यात मी काय आनंदी होणार. मी ते काम कसं केलं असतं यामध्ये मी माझा आनंद शोधतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. विचार करण्यासारखा हा विषय आहे. मालिका मी अजिबात बघत नाही. मला मालिका बघण्याचीच भीती वाटते” असं ते म्हणाले.
“निवेदिता मॅमचीही मालिका बघत नाही का?” असाही प्रश्न अशोक सराफ यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “एकदा म्हटलं ना मी की, मालिका बघताना मला भीती वाटते. काय असतं मालिकांमध्ये हल्ली कॉमेडी नसते. बिचाऱ्यांना कॉमेडी करण्याची संधीच मिळत नाही ना… नवरा-बायको, काका-काकी, तात्या नंतर मग कोणता तरी विलन आणि मग ते संपलं की, एकामागोमाग एक विलन असं सुरुच असतं. या सगळ्यामध्ये नक्की काय सुख मानायचं. मुळात मराठी मालिका या पुरुषांसाठी नाहीच. या मालिका फक्त बायकांसाठीच आहेत” असंही अशोक मामा म्हणाले.
मालिकांच्या प्रेक्षकवर्गाबाबत बोलताना ते म्हणाले, “मालिका ही गावागावांमध्ये पोहोचते. मालिका या गावांमध्ये अधिक प्रसिद्ध होतात. शहरामध्ये एक चॅनल नाही आवडलं तर दुसरा पर्याय आहे. पण गावामध्ये तसं नसतं. त्यांना आहे त्याच चॅनलवर दिसणाऱ्या मालिका बघाव्या लागतात” असंही ते म्हणाले.