‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या गेली सव्वाचार वर्षे प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल असलेली पाहायला मिळाली आहे. मालिकेत येणाऱ्या चढ-उतारांमुळे ही मालिका नेहमीच चर्चेत असते. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष ही पात्रे घराघरांत पोहोचली आहेत. मात्र, काही दिवसांपासून मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. हे ट्विस्ट प्रेक्षकांना आवडेनासे झाले असल्याने ही मालिका बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. (Madhurani Prabhulkar On Aai kuthe kay karte)
अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो बघून प्रेक्षक खूपच भडकल्याचे दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये आशुतोषचे निधन झाले असल्याचं दाखवलं आहे. आशुतोषच्या निधनाने अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे. या सगळ्याला आशुतोषची आई अरुंधतीला जबाबदार धरते. तेवढ्यात अरुंधतीची आधीची सासू कांचन तिथे येते आणि ती अरुंधतीच्या बाजूने ठामपणे उभी राहते. हा प्रोमो पाहून आता अरुंधतीनेही या मालिकेतील ट्विस्टवर भाष्य केलं आहे. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याला अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरने हजेरी लावली होती. यावेळी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिने मालिकेच्या या नव्या ट्विस्टबाबत भाष्य केलं आहे.
या सोहळ्याला मधुराणीने टिशूची साडी आणि डिझाइनर ब्लाउज परिधान केला होता. तसेच हॅन्ड क्राफटेड असे दागिने तिने घातले होते. मॉडर्न टच दिलेला हा अरुंधतीचा पारंपरिक लूक साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेबद्दल बोलताना मधुराणी म्हणाली की, “जवळजवळ सव्वाचार वर्ष या मालिकेला झाली आहेत. आणि यंदाच्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात हे चौथ नॉमिनेशन आहे. इतकी वर्ष होऊनही प्रेक्षकांना ही मालिका तितकीच आवडते, अरुंधतीवर प्रेक्षक इतकं प्रेम करतात की ते शब्दात सांगू शकत नाही. त्यासाठी मी स्टार प्रवाहचे आभार मानेन”.
मालिकेच्या नव्या प्रोमोबाबत बोलताना अरुंधती म्हणाली, “प्रोमो पाहून प्रेक्षक हलले. आशुतोष हे पात्र सर्वांना पाहायला आवडायचं आणि आमचा रोमान्स बघायला आवडायचा. पण आता खूप मोठा ट्विस्ट समोर आला आहे आणि मी स्वतः मधुराणी म्हणूनही या ट्विस्टला पचवू शकले नाही आहे. आशुतोष म्हणजे ओंकार हा माझा चांगला मित्र आहे. सेटवरही आमचं बॉण्डिंग खूप मस्त होत. आता तो नसणार याचं खूप दुःख आहे”.