तामिळ अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे नेते थलपती विजय यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), 2019 लागू केल्यानंतर त्यांच्यावर भाष्य केलं आहे. सध्या थलपती विजय यांचं हे भाष्य चर्चेत आलं आहे. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधून कागदपत्रांशिवाय भारतात आलेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांसाठी कायदा मंजूर झाल्यानंतर चार वर्षांनी, केंद्राने नियम घालून CAA हा कायदा लागू केला. तेव्हापासून अनेकजण या संदर्भात आपली मते मांडत आहेत. अशातच दाक्षिणात्य अभिनेता अभिनेता थलपती विजयनेही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. (Thalapathy Vijay on CAA)
ट्विटरवर जारी केलेल्या निवेदनात थलपती विजय यांनी म्हटले आहे की, “सीएएची अंमलबजावणी मान्य नाही. तमिळमध्ये जारी केलेल्या त्यांच्या विधानाचा अनुवाद शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “ज्या वातावरणात देशातील सर्व नागरिक सामाजिक सौहार्दात राहतात, तेथे भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (CAA) सारख्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी मान्य नाही. हा कायदा तामिळनाडूत लागू करु नये”, अशी विनंती त्यांनी तामिळनाडू सरकारला केली आहे.
या कायद्याची तामिळनाडूमध्ये अंमलबजावणी होणार नाही याची राजकारण्यांनी खात्री करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. विजय व्यतिरिक्त, इतर विरोधी नेत्यांनीही नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे नियम अधिसूचित केल्याबद्दल केंद्रावर टीका केली आहे आणि भाजप सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी समाजात फूट पाडण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हा भाजपचा ‘विभाजनाचा अजेंडा’ असल्याचे म्हटले आहे. आणि लोक त्यांना (भाजपला) योग्य धडा शिकवतील, असंही वक्तव्य केलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता थलपती विजयने राजकारणात प्रवेश केला आहे. थलपथी विजयने काही दिवसांपूर्वी त्याच्या पक्षाची घोषणा केली आहे ज्याचे नाव ‘तमिलागा वेत्री कझघम’ आहे. निवडणुक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यात आली असल्याचेही थलपती विजयने स्पष्ट केलं आहे. विजयचा ‘तमिलागा वेत्री कझघम’ हा पक्ष २०२६ची विधानसभा निवडणुक लढणार आहे.