मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार स्वतःच्या हिंमतीवर उभे राहिले आणि त्यांनी या क्षेत्रात आपलं नाव कमावलं. हिच कलाकार मंडळी त्यांच्या मुलांना या क्षेत्रात उतरवण्यासाठी स्वतःच्या नावाचा वापर करतात असं बोललं जातं. बऱ्याचवेळा यावरुन त्यांच्या मुलांना ट्रोलही केलं जातं. पण काही कलाकार असेही आहेत ज्यांनी हे क्षेत्र स्वतःच्या हिंमतीवर निवडलं व या क्षेत्रात आपलं नाव कमावलं. त्यापैकी एक अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी.मृणालचा मुलगा म्हणून विराजसची ओळख असली तरी त्याने या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे करत असताना त्याने आईचा नावाचा वापर कधीच केला नाही. याबद्दल त्याने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. (virajas told why he not use mother contact)
तो म्हणाला, “ माझं व आईचं क्षेत्र अगदी वेगळं होतं. आई मालिका क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होती. तर मी माझ्या नाटकांच्या क्षेत्रात व्यग्र होतो. तिच्या व माझ्या कामाचा तसा संबंध नव्हता. ती तिच्या क्षेत्रात बरीच प्रसिद्ध होती. मी या क्षेत्रात येण्यासाठी तिच्या ओळखीचा वापर करू शकलो असतो. ती स्वतः चित्रपट दिग्दर्शिकाही होती. तिला सांगून मी हिरो म्हणून माझ्या करिअरची सुरूवात केली असती पण ते मी केलं नाही”.“कारण मला माहित होतं जर मी आईच्या आधाराने या क्षेत्रात उतरलो असतो तर मी या क्षेत्रात कधीच टिकलो नसतो. कारण या क्षेत्रात तोच टिकतो जो पहिल्यापासून घडत आला आहे. मी माझ्या ओळखीतून करिअरची सुरुवात केली. माझं नाटक ‘झी गौरव पुरस्कारां’साठीही नामांकित होतं. त्यामुळे माझी ओळख मालिका क्षेत्राशी होऊ लागली होती”.
विराजसला पहिली मुख्य भूमिका ‘झी’कडून मिळाली होती, त्यावेळीच्या ऑडिशनबद्दल तो सांगतो, “मी नाटकांच्या प्रयोगात व्यग्र होतो. मला ‘झी’कडून ‘माझा होशील ना’ मालिकेच्या भूमिकेसाठी ऑडिशनचा कॉल आला. तेव्हा मी चित्रपटाच्या एका भूमिकेसाठी दाढी, केस वाढवायचे होते. मी ऑडिशनला गेलो तर त्यांनी माझा हा अवतार बघून ‘तुझा अभिनय चांगला आहे पण तुझा लूक? तू या भूमिकेसाठी कसा दिसशील प्रश्न आहे’, असं ते म्हणत त्यांनी या ऑडिशनसाठी मला केसही कापायला लावले. पण तरीही त्यांनी मला निवडलं नव्हतं”.मालिकेत भूमिका मिळेलच याची शाश्वती नव्हती त्यामुळे विराजस पुण्यात निघून गेला. कारण दुसऱ्या दिवशी पुण्यात त्याचा नाटकाचा प्रयोग होता. पुण्यात पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच त्याला निवड झाल्यासाठीचा फोन आला आणि लगेच त्याला मुंबईत बोलावलं.
पुण्यातला प्रयोग संपवून दुसऱ्या दिवशी तो लगेच मुंबईत पोहोचला.विराजस गंमतीने म्हणतो की, त्यांना शेवटपर्यंत या भूमिकेसाठी कोणीही मिळालं नव्हतं म्हणून त्यांनी शेवटी माझं ऑडिशन घेतलं. कारण दुसऱ्या दिवसापासून लगेचच मालिकेच्या शूटिंगला सुरुवात होणार होती.विराजसने ही भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारली. या क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरीही लोक जर असं म्हणत असतील की, आईच्या ओळखीने तो या क्षेत्रात आहे तर तो यावर मौन पाळणं पसंत करतो. बाकी त्याच्या कामावर त्याचा पूर्ण विश्वास आहे.विराजसने विविध भूमिका साकारत मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. तो नाटकांमध्ये तर सुरुवातीपासूनच सक्रिय होता. आता त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही झेप घेतली आहे. त्याच्या दिग्दर्शनाचं प्रेक्षक कौतुक करत असून त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘व्हिक्टोरिया’ चित्रपट प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरला आहे.