marathi actor sumeet raghvan : सामाजिक, राजकीय वा आशयघन मुद्द्यांवर कलाक्षेत्रातील मंडळी बरेचदा भाष्य करताना दिसतात. यामध्ये एका अभिनेत्याचं नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे सुमित राघवन. सुमित राघवनने आजवर अनेकदा सडेतोडपणे भाष्य केलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा सुमित यांनी सोशल मीडियावर एक संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. एक नागरिक म्हणून सुमित यांनी सोशल मीडियावर कळसुबाई शिखरावर कचरा असणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आजकाल जिकडे तिकडे कचरा असणाऱ्या अनेक व्हिडीओ त्रस्त नागरिक शेअर करताना दिसतात. काही विचित्र स्वभावाची माणसं हा कचरा करतात त्यामुळे हा नाहक त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो.
Sustainif Your Life या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेला कळसूबाई शिखरावरील कचऱ्याचा व्हिडीओ सुमित यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि या व्हिडीओसह एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमीत म्हणतो, “शरम वाटते. खरंच कुठे नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र?” पुढे तो म्हणतो, “एरव्ही ‘शिवरायांचा महाराष्ट्र’ म्हणून गळा काढणारा प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांच्या अनुयायांची अशा वेळी अस्मिता दुखावली जात नाही? घेईल का कोणी जबाबदारी? कठोर कारवाई होईल का? आपल्या ऐतिहासिक वास्तूंची आपण काळजी घेऊ शकतो का? हा प्रश्न जनतेलासुद्धा आहे”.

दरम्यान, Sustainif Your Life या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये कळसूबाई शिखरावर सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. कचऱ्याच्या या व्हिडीओसह असं म्हटलं आहे, “महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर प्लास्टिकच्या विळख्यात! कळसूबाई हे पूर्वी निसर्गप्रेमींसाठी एक पवित्र ठिकाण मानलं जायचं. पण, आज तिथे चहाच्या कपांपासून पाण्याच्या बाटल्यांपर्यंत ते चिप्सच्या रिकाम्या पुड्यांपासून इतर कचऱ्यानं संपूर्ण परिसर भरून गेला आहे. ७०% पेक्षा जास्त ट्रेकर्स ट्रेकिंगदरम्यान प्लास्टिकसारख्या वस्तू वापरतात. पण, हा कचरा जातो तरी कुठे? ते सगळं परत डोंगरावरच फेकलं जातं”.
कचऱ्यासंदर्भात सुमितने शेअर केलेली ही पोस्ट अनेकांना पटली आहे. सुमित यांच्याव्यतिरिक्त अनेक कलाकार मंडळीनीही परिसरात पसरलेल्या कचऱ्यासंदर्भात आवाज उठविला आहे.





