shashank ketkar on mumbai roads : मराठी अभिनेता शशांक केतकर मालिकेबरोबरच सोशल मीडियावर चर्चेत असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. बरेचदा शशांक त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून समाजातील त्रास होणाऱ्या सद्य स्थितीवर भाष्य करताना दिसतो. अशातच आता पुन्हा एकदा शशांकने शूटिंगदरम्यान रस्त्यांच्या वाईट अवस्थेमुळे होणाऱ्या त्रासाबाबत भाष्य केले आहे. शशांकने पोस्ट शेअर करत मढच्या रस्त्यांवरुन आवाज उठविला आहे. यापूर्वी अनेक कलाकारांनी शूटिंगला जाताना रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत भाष्य केलं.
शशांकने रस्त्यांची वाईट अवस्था दाखवत असं म्हटलं की, ‘या देशातील रस्ते, रस्त्यांची एकंदर परिस्थिती हा फारच गमतीशीर विषय आहे. मला त्याबद्दल कायमच बोलायला आवडतं. कारण, हा देश माझा आहे. या देशातील रस्ते माझे आहेत आणि या रस्त्यांवरती माझ्या पैशाने विकत घेतलेली महागडी गाडी मी स्वत: चालवणार आहे. आजचा विषय आहे मढचा रस्ता. आजचा मुद्दा मांडण्याआधी एक डिसक्लेमर देतो. इंडस्ट्रीमधील माझा असा एक मित्र परिवार आहे. जो मला चिडवत असतो की आला आमचा म्होरक्या आला. हा सगळ्या रस्त्यांबद्दल बोलणार. यालाच सगळे खड्डे दिसतात. त्यांना मला एकच सांगायचं आहे की, मित्रांनो या रस्त्यावरती फक्त मी एकटा गाडी चालवणार नाही. कारण हा रस्ता माझ्या एकट्याच्या बापाचा नाही. तुमच्याही बापाचा नाही. हा आपल्या देशाचा रस्ता आहे. शूटिंगसाठी जसं मी इथे येतो, तसं तुम्हीसुद्धा येता. उद्या माझी गाडी त्या खड्ड्यामध्ये गेली, माझ्या गाडीचं काही नुकसान झालं तसं परवा तुमच्याही गाडीचं नुकसान होऊ शकतं आणि ते होऊ नये म्हणून माझा कायम प्रयत्न असतो. तर मी जर तुमचा म्होरक्या असणार असेन, तर असू दे. तुम्ही बोलत नसाल, तर मला बोलू द्या”.
शशांक पुढे म्हणाला, “मढचा रस्ता हा आजचा विषय आहे. मढ आयलंडला जाणारा जो रस्ता आहे, अनेक दशकं तो रस्ता झालेला नव्हता. त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामध्ये गावकऱ्यांची वेगळी मागणी होती, शूटिंग करणाऱ्यांची वेगळी मागणी होती. इथे किती कायदेशीर आणि किती बेकायदेशीर काम चालतं, हा विषय वेगळा आहे. पण, तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे, पण त्यासाठी लोकांनी गैरसोय सहन करा, याची एका तराजूमध्ये तुलना होऊ शकत नाही. जर तुम्हाला विकास करायचा असेल, इकडे एक वेगळी इंडस्ट्री उभी करायची असेल, गावकऱ्यांना एक सुखी आयुष्य द्यायचं असेल तर तुम्हाला विकास करावा लागणार आहे. ते करण्याकडे तुम्ही लक्ष द्या. जो अनेक दशके रस्ता झालेला नव्हता, त्याचं गेली एक-दोन वर्षे काम चालूच आहेच. ५०-६० टक्के रस्ता पूर्ण केलेला आहे. जो तयार झालेला रस्ता आहे. त्यामध्ये ड्रेनेजला लोखंडी झाकणं लावलेली आहेत. ती इतकी ताकदवान आहेत की ट्रक सोडाच. पण, सायकल त्याच्यावरुन गेली तरी तुटतील. तर त्याचं उदाहरण बघा”, असं म्हणत शशांकने ड्रेनेजची तुटलेली झाकणं आणि त्यावर नारळाची झावळी टाकलेली वस्तुस्थिती दाखविली.
पुढे शशांक असं म्हणाला की, “मागच्या एक दीड आठवड्यांपासून या ड्रेनेजची अवस्था अशीच आहे आणि महानगरपालिकेचं हे म्हणणं असेल की आम्ही काम करणारच आहोत, म्हणून नारळाची झावळी खोचून ठेवली आहे. तर तुमची अॅक्शन कमाल आहे. आमच्या महागड्या गाड्यांचं चाक जर त्यामध्ये गेलं,तर त्या गाड्या अडकून पडणार आहेत. आमच्या गाडीला डॅमेज होणार आहे. तर महानगरपालिकेला माझी विनंती आहे की आमचं जे काही डॅमेज होईल, ते भरण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. एखादा बाईक चालवणारा तिथून गेला, तर त्याच्या जीवाची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?”.
आणखी वाचा – अखेर अभिनेत्री ईशा डे आणि अभिषेकचा विवाहसोहळा संपन्न; पारंपरिक अंदाजात पार पडलं लग्न; फोटो समोर
शंशाकने हा व्हिडीओ शेअर करत, “Highway असो वा शहरातला, गावातला छोटा रस्ता… प्रवास करणारा जिवंत माणूस असतो. अनेक चालक नियम पाळत नाहीत मान्य आहे पण या अशा उघड्या गटारांचं काय करायचं? या गटारांमुळे अपघात झाला, जीव गेला तर जबाबदार कोण ? की मुंबईच स्पिरिट या नावाखाली हेही सहन करायचं आम्ही? शेवटी आपल्या देशात आपल्या जीवाची किंमत शून्य आहे याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो. आपली लोकसंख्याच इतकी आहे की या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं तर काय बिघडलं! बरोबर? यावर तातडीने ऍक्शन घेतली जाईल आणि संभाव्य अपघात टाळले जातील. माझा तुमच्यावर विश्वास आहे”, असं कॅप्शन लिहिलं आहे.





