shantanu gangane on Payment issue : मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांची बरेचदा मानधन वेळेत न मिळण्यावरुन तक्रार असते. अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी यावर आवाज उठवतात. साधारण सहकलाकार यांत भरडले जातात. तर नायक, नायिकांची ही तक्रार सहसा कानावर येत नाही. मालिकांमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याचे मानधन हे ९० दिवसांनी मिळायची पद्धत आहे. अशाने ज्यांचे पोट केवळ अभिनयावर चालते त्यांना ही समस्या अधिक भेडसावते. केवळ कलाकारच नव्हे तर तंत्रज्ञ व इतर टीमबरोबरही हेच होतं. बरेचदा पाच-सहा महिने त्यांना मानधन दिलं जात नाही. या परिस्थितीत योग्य त्या वेळी कामाचा मोबदला मिळायला हवा असा हट्ट करत आता मालिकाविश्वातील एका अभिनेत्याने न्याय मिळवून द्यायला आवाज उठविला आहे. हा अभिनेता म्हणजे शंतनू गंगणे.
शंतनू गंगणे सध्या पारू या मालिकेत मोहन किर्लोस्कर ही भूमिका साकारत आहेत. अभिनेत्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे वेळच्या वेळी मानधन न मिळण्यावरुन भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “नमस्कार, मी शंतनू शिवाजीराव गंगणे, मराठी चित्रपट व टीव्ही कलाकार तसेच कार्यकारी निर्माता आणि भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडत आहे. आपल्यापैकी अनेक कलाकार, तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट, डिझायनर यांना मानधनासाठी ९० दिवसांनंतरही साधारण १२० ते १५० दिवस वाट पाहावी लागते. ज्यांच्याकडे दुसरे उत्पन्न आहे ते सुदैवी; पण जे पूर्णपणे या व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी हा प्रकार भीषण आहे. अनेकवेळा त्यांना रक्कम कमी करुन घ्यावी लागते, तडजोड करावी लागते, किंवा तक्रार नोंदवली तर काम मिळेल की नाही ही भीती वाटते. याशिवाय काही कलाकारांना त्यांचं मानधन सुद्धा मिळत आहे. ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. आपण सगळ्यांनी आवाज उठवण्याची वेळ आली आहे”.
पुढे त्याने म्हटलं आहे, “मालिकाविश्वातील कलाकारांच्या मदतीसाठी कोणतीही संघटना नाही. ९० दिवसांनी पैसे ही संकल्पना नेमकी कोणी सुरु केली याची मला खरंच कल्पना नाही. ९० दिवसांनीही अनेकांना पेमेंट मिळत नाही. भारत सरकारची जी मायक्रो बिझनेसची स्किम आहे. याअंतर्गत रजिस्टर झालेल्या कंपन्यांना चॅनेल ४५ दिवसांमध्ये पेमेंट करतं. मग निर्मात्यांना ४५ दिवसांमध्ये पैसे मिळूनही या कंपन्या कलाकारांना वेळेत पैसे का देत नाहीत? हे चुकीचं आहे. याच्याबद्दल मी आवाज उठवत आहे”.
अखेर त्याने म्हटलं आहे की, “आपलीही अशीच तक्रार असल्यास मला WhatsApp वर तुमची तक्रार माननीय सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नावे अर्ज करुन मला १८ जून पर्यंत पाठवावी किंवा माझ्याबरोबर यावे ही विनंती. (१८ जून नंतर माननीय मंत्री महोदय यांची वेळ घेऊन त्यांच्याकडे सर्वांच्या तक्रारी पोहोचवल्या जातील) अत्यंत महत्त्वाची विनंती ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी ही पोस्ट शेअर करावी. जेणेकरुन ही माहिती जास्तीत जास्त कलाकार तंत्रज्ञ आणि कामगारांपर्यंत पोहोचू शकेल, ज्यांच्याबरोबर अशा प्रकारचा अन्याय किंवा त्रास झाला आहे, त्यांना न्याय मिळेल. तुमचं नाव कुठे येणार नाही, याची मी ग्वाही देतो”, असं आवाहन शंतनूने मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांना केलं आहे.
आणखी वाचा – लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, शाही लूकची चर्चा, आदिनाथ कोठारेसह केलंय काम…
शेवटी तो म्हणाला, “खरंतर आपण निर्मात्यांना पोशिंदा समजतो, पण तेच जर असं वागत असतील तर हे चुकीचं आहे. कदाचित या व्हिडीओनंतर मला काम मिळणं बंद होईल किंवा मला टाळलं जाईल, याची मला काळजी नाही. मी जर योग्य असेल तर आई तुळजाभवानी मला बळ देईल. माझे कलाकार, तंत्रज्ञ माझ्या पाठीशी उभे राहतील आणि हा जो चुकीचा प्रकार चालू आहे, त्याबद्दल आवाज उठवतील”.