आपल्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या हृदयात जागा बनवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच मकरंद अनासपुरे. मकरंद अनासपुरे यांच्याकडे भन्नाट कॉमिक टाइमिंग आणि लोकांना हसवण्याचं नैसर्गिक असं कौशल्य आहे. गेल्या एक दशकाहून अधिक काळ त्यांनी मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. मकरंद अनासपुरे यांना एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ते आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आज सर्वत्र ओळखलं जात. मात्र सिनेसृष्टीतील त्यांचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून लहान मोठ्या भूमिका साकारत मकरंद अनासपुरे यांनी प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडली. (Makarand anaspure on Politics)
यानंतर आता मकरंद अनासपुरे यांचा ‘राजकारण गेलं मिशीत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवासांपासून मकरंद हे या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त होते. अशातच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मकरंद यांनी राजकारणाबाबत भाष्य केलं. नुकतीच त्यांनी ‘रेडिओ सिटी’ ला मुलाखत दिली. यावेळी राजकारणात तुम्ही जाल का?, असा प्रश्न विचारला होता.
याचं उत्तर देत मकरंद अनासपुरे म्हणाले, “कलावंत म्हणून तीन दशक काढल्यानंतर चला आता म्हातारपणात राजकारणात जाऊ याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. आमचा तेवढा अभ्यास आहे का?, राजकारणात जाणं म्हणजे हॉटेलमध्ये जाण्यासारख नाही आहे. चला आज या हॉटेलमध्ये जाऊन मस्तानी खाऊया इतकं हे सोप्प नसतं”.
पुढे ते म्हणाले, “आमच्या क्षेत्रात येताना लोकं म्हणतात सर मला पण अभिनय करायचा आहे?, तर मी त्याला विचारतो, तू काय शिकला आहेस या क्षेत्रात. तो म्हणतो, काही नाही. कधीतरी शाळेत एकदा नाटकात काम केलं होतं. तर मी त्याला म्हणतो, तुला पंखा दुरुस्त करता येतो का?, तो म्हणतो, नाही. मी म्हणतो का?, तर तो म्हणतो, त्यातलं काही माहीत नाही. मी म्हटलं तसंच असतं प्रत्येक क्षेत्राचं. तुम्हाला तितका अभ्यास व अध्ययन केल्याशिवाय त्या क्षेत्रात जाण्याची मुभा नाही. आम्ही उत्तम बोलू शकतो म्हणून आम्ही संसदेत जाऊन भरपूर भाषणं केली, पण कार्य कुशलतेच काय?, मुळात राजकारण म्हणून समजून घेण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, जो आवाका लागतो तो तुमच्याकडे असला पाहिजे तर तुम्ही राजकारणात जाऊ शकता”.