विशाखा सुभेदार. मराठी विनोदी विश्वातील एक लोकप्रिय नाव. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या विनोदी कार्यक्रमांतून अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार घराघरात पोहोचल्या. विनोदाची अचूक जाण व टायमिंग साधत त्यांनी प्रत्येक विनोदी भूमिका अगदी अचूक वठवली. केवळ पोट धरुन हसवणारी विनोदी भूमिका नाही, तर राग व चीड येईल अशी खलनायिकाही त्या उत्तमरित्या निभावत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत त्या साकारत असलेल्या ‘रागिणी’.
आपल्या विनोदी, गंभीर व खलनायिकेच्या भूमिकांमधून चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. आजवर आपल्या भूमिकांनी चर्चेत राहणाऱ्या विशाखा त्यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत. विशाखा यांना ‘राम नगरकर पुरस्कार सोहळा २०२४’ मध्ये गौरविण्यात आलं. याचे काही फोटो शेअर करत त्यांनी एक खास पोस्ट लिहिली असून या पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
विशाखा यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “राम नगरकर पुरस्कार सोहळा २०२४. हा पुरस्कार माझ्या गुरु स्थानी असलेल्या दोन सचिन मास्तर यांच्याकडून मिळाला हे ही माझं भाग्य. पण हा पुरस्कार देण्याचे ज्यांनी ठरवलं ते वंदन नगरकर हयात नाही याचे मात्र वाईट वाटले.”
यापुढे त्यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “फु बाई फु ते हास्यजत्रा. विनोदी प्रहसन सादर करीत आले, त्याची शाबासकी मिळाली. पुरस्कार म्हटलं की, जबाबदारी आलीच. मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तुन बाहेर पडले याचा अर्थ असा नाही होत की, मी विनोदी अभिनय करण सोडलं. फक्त एक ब्रेक घेतला होता. मात्र पुन्हा एखाद्या विनोदी भूमिकेत दिसेनच.”
यापुढे त्यांनी रसिकांचे व नगरकरांचे आभारही मानले आहेत. तसेच त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर समीर चौघुले यांनी कमेंट करत विशाखा यांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांचं अभिनंदनही केले आहे. त्याचबरोबर विशाखा यांच्या चाहत्यांनीदेखील कमेंट्सद्वारे त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.