मराठी मनोरंजनसृष्टीत विविध चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहेत. तर काही चित्रपट प्रदर्शनासाठी उभे ठाकले आहेत. जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा धमाकेदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण भारतासह लंडनमध्येही झालं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी अभिनेते भरत जाधव पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. तर अभिनेत्री ऋतुजा बागवे देखील या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (after many year bharat jadhav come back in movie)
नुकतंच ऋतुजाने इन्स्टाग्रामवरून या चित्रपटाचं पोस्ट शेअर केलं आहे. त्यात ती लिहीते, ‘नायिका/नायक म्हणून माझा पहिला चित्रपट. तिखट तर्री घालून ४४० व्होल्टचा झटका द्यायला येत आहे. ‘लंडन मिसळ’ फॅमिली एंटरटेनमेंटची झणझणीत मेजवानी! 8 डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात’, असं कॅप्शन देत ती या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच आगमन करणार असल्याचं तिने सांगितलं. त्याचबरोबर या चित्रपटात निव्वळ मनोरंजन असणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.
शेअर केलेल्या पोस्टरवर ऋतुजा हटके लूक पाहायला मिळत आहे. तिच्याबरोबर अभिनेते भरत जाधव, गौरव मोरे व अभिनेत्री रितिका श्रोत्रीही दिसत आहे. अभिनेते भरत जाधव हे नेहमीच आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांना सरप्राईज देत असतात. या चित्रपटातील त्यांची भूमिका काही अशीच असणार असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटात भरत यांनी पहिल्यांदाच रॅप गाणं देखील गायलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून प्रेरित हा चित्रपट आहे हे या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.या चित्रपटात अभिनेत्री ऋतुजा बागवे, भरत जाधव यांच्यासह रितिका श्रोत्री, माधुरी पवार, अभिनेता गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर भरत जाधव एका हटके भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पूरेपूर मेजवानीचा बेत असणार आहे.
चित्रपटात आदिती व रावी अशा दोन सख्ख्या लंडनमध्ये राहणाऱ्या बहिणींची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्माती अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै व आरोन बसनेट यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनीच या चित्रपटाची कथा लिहीली आहे. या चित्रपटाचं सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केलं आहे.