‘ये है मोहब्बतें’ तसेच ‘शुभ शगुन’ मालिकेत शेहजादा धामीबरोबर अभिनय केलेली मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने या मालिकेच्या निर्मात्यांवर काही गंभीर आरोप केले होते. कृष्णाच्या या आरोपांनंतर शोच्या निर्मात्याचे वक्तव्य आले असून, त्यांनी कृष्णाचे हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
मालिकेचे निर्माते कुंदन सिंह यांनी आता आपली बाजू मांडली असून हे आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी माझ्यावरील आरोप खोटे असून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे याविरोधात मी कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या लोकांपासून सावध राहावे असेही म्हटलं आहे.
कुंदनने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये असा दावाही केला आहे की कृष्णाने याआधीही अशाच प्रकारचे आरोप करून शोमधील दोन लोकांना गोवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आमची टीम त्याच्या पाठीशी उभी होती. मी तिच्या वडिलांशी संभाषणदेखील केले होते, आम्ही त्वरित कारवाई केली आणि दोन कर्मचाऱ्यांना काढून टाकले. मात्र, हे आरोप खोटे असून ते वैयक्तिक वैमनस्यातून हे आरोप केले गेले असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
निर्मात्याने आपल्या पोस्टमध्ये असेही स्पष्ट केले आहे की, जो कोणी कृष्णाचे हे आरोप शेअर करत आहे त्यांनी हेही लक्षात ठेवावे की, शेवटी सत्याचाच विजय होतो. खोटे आरोप करून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांपासून सावध राहा. दरम्यान, ‘शुभ शगुन’च्या सेटवर झालेल्या छेडछाडीच्या आरोपांबाबत कृष्णा मुखर्जीने प्रथमच विधान केले होते. तिला निर्मात्याकडून धमक्याही येत असल्याचेही तिने यावेळी सांगितले.
अशातच आता निर्मात्यानेदेखील त्यांची बाजू मांडत हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हणत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमका दोषी कोण? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.