बॉलिवूड, हिंदी इंडस्ट्री तसेच आजूबाजुला घडणाऱ्या घडामोडी याबाबत जावेद अख्तर अगदी परखडपणे आपलं मत मांडतात. आताही त्यांनी बॉलिवूडची सध्याची सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर मांडली आहे. हिंदी चित्रपटाच्या कथेतील मुळ आणि मुख्य जीव कुठेतरी हरवत चालला असल्याचं जावेद यांनी म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर साऊथकडील अभिनेत्यांना कोणी ओळखत नसूनही त्यांचे चित्रपट सुपरहिट होतात असं त्यांचं म्हणणं आहे. हिंदी चित्रपटात काम करणारे आताचे कलाकार त्यांचं मूळच विसरले असल्याचा दावाही त्यांनी केला. जावेद नक्की काय काय म्हणाले?, बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत एकूणच त्यांचं मत काय? हे जाणून घेऊया. (javed Akhtar on south film industry)
द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी म्हटलं की, “मला हिंदी इंडस्ट्रीबाबत एक तक्रार आहे. चित्रपटांकडे अगदी खोलात जाऊन पाहिलं तर अनेक गोष्टी कमी असल्याचं जाणवतं. एक्शनपटावर चित्रपटांचा जोर आहे. तीन पात्रांवर आधारित चित्रपट बनवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा कथेचा खरा जीव हरवतो. कित्येकवेळा मी असे चित्रपट नाकारले आहेत जे पुढे जाऊन सुपरहिट ठरले”.
आणखी वाचा – वडील सुपरस्टार तरीही कामासाठी वणवण; शेखर सुमन यांच्या लेकाची खंत, म्हणाला, “दोष इंडस्ट्रीला देऊ का?”
“कित्येक साऊथचे चित्रपट असे आहेत की, त्यांना त्यांच्याच भागात कोणीही ओळखत नाही. पण ते चित्रपट सुपरहिट ठरले. काही हिंदी चित्रपट साऊथ चित्रपटांच्या आधारे बनवले जातात. पण साऊथ चित्रपट मात्र त्यांच्या त्यांच्या लोकांनी स्वतः तयार केले आहेत. तेलुगू, तमिळ, मल्याळममध्येही त्यांची कथा ते स्वतः तयार करतात. हिंदी चित्रपट सगळ्यांसाठी बनवला जातो. पण साऊथ चित्रपट फक्त तिथल्या भाषिक प्रेक्षकांसाठी बनवला जातो. हिंदी चित्रपट काढणाऱ्यांनी स्वतःच्याच शहरातून काढता पाय घेतला आहे. ते आपल्या मुळ उद्देशामधून दुरावले आहेत”.
“त्यांचे आई-वडील पहिल्या पिढीचे होते. त्यांनी त्यांची मुळं घट्ट रोवून ठेवली होती. पण आताचे लोक हे मुंबईच्या संस्कृतीशी निगडीत आहेत. ते इंग्रजी भाषेतच स्वप्न बघतात. आपल्या आई-वडिलांसारखी त्यांनी संस्कृती जोडलेली नाही. ते त्यांच्या मुळाशीही जोडले गेलेले नाहीत. दुसरी बाजू लक्षात घेता तमिळनाडूमधील चित्रपट बनवणारे तमिळनाडूमध्येच आहेत. त्यांनी कुठेच पलायन केलेलं नाही”. जावेद यांनी बॉलिवूडबाबत अगदी स्पष्ट शब्दांमध्ये मत मांडलं.