मनोरंजन सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे अभिनयाव्यतिरिक्त उद्योग क्षेत्रातही आपला एक वेगळा ठसा उमटवत आहेत. मराठी नाटक, मालिका किंवा चित्रपट या माध्यमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याव्यतिरिक्त ही कलाकार मंडळी स्वत:च्या व्यवसायातही आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुप्रिया पाठारे, निरंजन कुलकर्णी, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहरे, यशोमान आपटे, श्रेया बुगडेसारख्या अनेक कलाकारांनी स्वत:चा छोटासा का होईना उद्योग सुरु केला आहे.
अशातच आता यात आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे आणि हा अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. हार्दिकने काही वर्षांपूर्वी स्वत:चा एक फूड ब्रँड सुरू केला होता. हार्दिकने ‘राणादा थंडाई’ म्हणून स्वत;चा एक ब्रॅंड सुरु केला होता. त्याच्या या नवीन व्यवसायाला चाहत्यांकडून तूफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे खवय्यांची मिळणारी वाढती पसंती पाहून आता त्याच्या व्यवसायाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या राणादा फुड्सच्या नवीन ब्रांच बद्दल सांगितलं आहे. “नमस्कार मंडळी… कोल्हापुरातील राजारामपुरी येथे माऊलीच्या पुतळ्याजवळ ‘राणादा फूड्स’चं नवीन आऊटलेट आम्ही सुरू करणार आहोत. याठिकाणी खवय्यांना बदाम थंडाई, मिसळ आणि शेगावची सुप्रसिद्ध कचोरी या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल. तर नक्की या!” असं म्हणत त्याने माहिती दिली आहे.
हार्दिकच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील भूमिकेमुळे थंडाई प्रसिद्ध झाली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. या मालिकेत तो पहिलवानच्या भूमिकेत दाखवण्यात आला असून यात तो सतत थंडाई घेत होता. त्यामुळे त्याला या थंडाईच्या नवीन व्यवसायाबदल कल्पना सुचली असून खवय्यांकडूनही त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, हार्दिकने तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर अनेक मालिका केल्या. सध्या तो स्टार प्रवाह वहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच त्याने काही चित्रपटांतदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.