Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna Post : ‘कलर्स’ वाहिनीवरील सर्वात चर्चित असलेला शो ‘बिग बॉस’ सीझन १९ चा प्रवास अखेर संपला आहे, या सीझनची ट्रॉफी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता गौरव खन्नाच्या नावावर झाली आहे. सलमान खानच्या दमदार होस्टिंगमुळे संपूर्ण सीझनभर प्रेक्षकांची उत्सुकता पाहायला मिळाली. अंतिम क्षणी सलमान खानने गौरव खन्नाचं नाव जाहीर करताच सेटसह संपूर्ण देशभरात त्याच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला.
‘बिग बॉस १९’ च्या संपूर्ण प्रवासात गौरव खन्नाने शांत, संयमी आणि ठाम खेळ खेळत प्रेक्षकांची मनं जिंकली. घरातील प्रत्येक कठीण टास्क, वाद-विवाद आणि भावनिक प्रसंगांत गौरवने स्वतःचा तोल कधीही ढळू दिला नाही. त्यामुळेच संपूर्ण सीझनमध्ये तो विजेतापदाचा दावेदार मानला जात होता. याचसह ‘टॉप ५’ मधील प्रणीत मोरे, फरहाना भट्ट, तानिया मित्तल आणि अमाल मल्लिक यांचा ही खेळ तितकाच लक्षवेधी ठरला.
आणखी वाचा – अखेर पारू-आदित्यचं अहिल्यादेवींनी केलं स्वागत, किर्लोस्कर घरात एंट्री केली अन्…; प्रोमो समोर
ट्रॉफी जिंकल्यानंतर गौरव खन्नाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली असून, ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गौरवने लिहिलं आहे की, “तीन महिन्यांचा हा प्रवास आज संपतोय आणि काय शेवट झालाय! ट्रॉफी अखेर घरी आली आहे. लोक सतत विचारायचे, ‘जीके काय करेल?’ आणि आज त्याचं उत्तर मिळालं आहे. हा विजय माझा एकट्याचा नाही; माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.” त्याने पुढे लिहिलं, “प्रत्येक चढ-उतार, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक विजयाच्या क्षणात प्रेक्षकांनी माझ्यासोबत साथ दिली. हा फक्त ट्रॉफीचा विजय नाही, तर विश्वास, प्रेम आणि एकतेचा उत्सव आहे. आपण सगळे मिळून जिंकलो आहोत.” गौरव खन्नाच्या या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट यांनी टॉप-2 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवलं होत. सलमान खानने दोघांचे हात धरत प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. अखेर गौरवचा हात वर करत त्याला ‘बिग बॉस १९’चा विजेता घोषित करण्यात आलं. अंतिम मतदानात गौरवला फरहाना भट्टपेक्षा अधिक मते मिळाली. फरहाना भट्ट या सीझनची रनरअप ठरली.





