मराठी चित्रपटसृष्टीसाठी कालचा दिवस विशेष होता. कारण, ‘गोदावरी’ व ‘एकदा काय झालं’ या दोन मराठी चित्रपटांनी यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर नाव कोरले आहे. दिग्दर्शक निखिल महाजन यांना ‘गोदावरी’ चित्रपटासाठी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर, सलील कुलकर्णी यांच्या ‘एकदा काय झालं’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. (Ekda Kaay Zala film)
संगीतकार सलील कुलकर्णी यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. संगीत दिग्दर्शनाबरोबर सलील यांनी अनेक चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शनही केले आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वेडिंगचा सिनेमा’ हा त्यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट. त्यानंतर त्यांनी ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट दिग्दर्शित केले होते. या चित्रपटात पालक व मुलांच्या सुंदर नात्याचे वर्णन करण्यात आले आहे. वेगळा विषय, चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय यांमुळे चित्रपटाची चांगलीच प्रशंसा झाली. शिवाय, हा चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ठेवण्यात आलं होतं.
आता या चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांना प्रचंड आनंद झाला आहे. या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय त्यांनी मराठी प्रेक्षकांना व त्यांच्या मुलांना देत त्यांचे आभार मानले आहेत. पुरस्काराच्या घोषणेनंतर सलील कुलकर्णी यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले, “गेली २५ ते २६ वर्ष मी जे संगीत, लेखन, दिग्दर्शन करत आहे त्याची मेहनत म्हणजे ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट आहे. मला नेहमी असं वाटतं की, आजची गोष्ट सांगावी. आपल्याकडे खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठ्या घटना होऊन गेल्या आहेत. पण आज माणसाला काय वाटतंय, त्याची गोष्ट सांगायला मला स्वतःला आवडतं किंवा ते मला येतं असं मी म्हणेन. आणि नात्यांची गोष्ट असल्यामुळे ‘एकदा काय झालं’ नावावरूनच चित्रपटाची कथा काय असेल याचा अंदाज येतो. कारण, आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशी करतो, की एकदा काय झालं.”
हे देखील वाचा – ‘अंकुश’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, गौरव मोरेचीही दिसली झलक, पाहा व्हिडीओ
तर ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट आम्ही करायचं ठरवलं तेव्हा अनेक निर्माते फार प्रेमाने त्याच्या मागे उभे राहिले. शंकर व सिद्धार्थ महादेवन त्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला. हा खूप हळवा विषय असून जेव्हा एखादा हळवा विषय यशस्वी ठरतो तेव्हा माझ्यासारखे अनेक लेखक-दिग्दर्शक आहेत त्यांना कुठेतरी एक शक्ती मिळेल. मराठी मध्यमवर्गीय घरातील मुलगा जर संगीतक्षेत्रात बरं नाव कमावू शकतो, चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकतो तर माझ्या निमित्ताने अनेक मराठी मध्यमवर्गीय घरातील मुलांना हे स्वप्न बघण्याची शक्ती येते. मी एक प्रामाणिक गोष्ट हाताशी धरुन कायम काम करतो, की जे आपल्याला मनापासून करावंसं वाटलं. तेच करायचं. या पुरस्काराचे सगळे श्रेय मी जगभरातील मराठी रसिकांना देतो. आणि माझ्या मुलांना देतो.”, असे म्हणत निवडकर्त्यांचे व प्रेक्षकांचे आभार मानले.
हे देखील वाचा – राष्ट्रीय पुरस्कारांच्या शर्यतीत कंगना रणौतचा पराभव, आलिया भट्ट व क्रिती सेनॉनला पुरस्कार जाहिर झाल्यानंतर म्हणाली, “निराश झालेल्या…”
दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. सुमित राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे, मोहन आगाशे यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. विशेष म्हणजे, सलील कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन अशी तिहेरी जवाबदारी पार पाडली होती. (Ekda Kaay Zala film gots National Film Award)