आपल्या ग्लॅमरस लूक व अभिनयाने चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटीया नुकतीच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. आयपीएल २०२३शी संबंधित एका प्रकरणात तिला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले असून अभिनेत्रीला २९ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याच प्रकरणी अभिनेता संजय दत्तलाही समन्स बजावण्यात आले होते. मात्र तेव्हा अभिनेत्याने नवीन तारखेची मागणी केली. त्यामुळे आता या प्रकरणामुळे तमन्ना अडचणीत सापडली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटियाला फेअरप्ले ॲपवर मॅचच्या बेकायदेशीर स्ट्रिमिंगबाबत चौकशीसाठी बोलावले. न्यूज एजन्सी एएनआयने केलेल्या ट्विटनुसार, “महाराष्ट्र सायबरने फेअरप्ले ॲपवर IPL २०२३ च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला चौकशीसाठी बोलावलं आहे. या स्ट्रीमिंगमुले वायकॉम कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे तिला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ती सायबर सेलच्या प्रश्नांना उत्तरं देण्यास बांधील असेल”.
बेकायदेशीर स्ट्रिमिंगच्या तपासाचे हे प्रकरण सप्टेंबर २०२३चे आहे, जेव्हा वायकॉमने ‘फेअरप्ले’ ॲपवर त्यांच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे (IPR) उल्लंघन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. नेटवर्ककडे सामने स्ट्रीम करण्याचे अनन्य अधिकार असूनही, ‘फेअरप्ले’ ॲप कथितरित्या ते बेकायदेशीरपणे प्रसारित करत होते, ज्यामुळे नेटवर्कचे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे.
आणखी वाचा – विकी कौशलने केलं मराठमोळ्या अभिनेत्याचं कौतुक, मराठी भाषेत साधला खास संवाद, म्हणाला, “संतोषबरोबर काम करणं…”
दरम्यान, तमन्नाला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर व्हावे लागणार आहे. या तपासाच्या माध्यमातून, फेअर प्ले ॲपवर आयपीएल २०२३च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगबद्दलचा पोलिस शोध घेत आहेत. तमन्नाला समन्स बजावण्यात आल्याची ही बातमी समोर येताच काही चाहत्यांनी अभिनेत्रीबद्दल चिंता वाटत आहे. याशिवाय काही चाहते अभिनेत्रीला पाठिंबा देत तिला पाठिंबा देताना दिसत आहेत.