प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार मंडळी बरीच धडपड करत असतात. सेटवर १२ ते १३ तास काम करतात. इतके तास सेटवर असल्यानंतर तेथील जागा आणि वास्तूशी त्यांची एक वेगळीच नाळ जोडली जाते. प्रत्येक सेटचा अनुभवही कलाकारांना येतो. काही वास्तू सकारात्मक वाटतात. तर काही कलाकारांना नकारात्मकताही जाणवते. असंच काहीसं सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोलबाबतही घडलं आहे. बरीच वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर तिने याबाबत भाष्य केलं. काजोलने सेटवरचा अनुभव शेअर करत नकारात्मक गोष्टींविषयी उघडपणे सांगितलं. (kajol calls ramoji film city haunted)
रामोजी फिल्म सिटीमध्ये काही सेटवर शूट करत असताना काजोलला विचित्र अनुभव आले. याचबाबत तिने स्पष्ट सांगितलं. जिवंत परत आली ही देवाची कृपा असंही काजोल यावेळी म्हणाली. रामोजी फिल्म सिटीमध्ये भुताटकी असल्याचं काजोलचं म्हणणं आहे. तिला पुन्हा तिथे शूट करण्याचीही इच्छा नाही. असं काजोलनेच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
आणखी वाचा – “फक्त प्रसिद्धी व नाव हवंय आणि…”, चर्चेत राहण्यासाठी गोविंदाच्या पत्नीची धडपड, म्हणाली, “आडनाव काढलं कारण…”
काजोल म्हणाली, “तिथे चित्रीकरण म्हणजे भयंकर. रात्री शूट झाल्यानंतर कुठे झोपायचं? हेही आम्हाला तेव्हा माहित नसायचं. तिथून बाहेर जरी पडलो तरी पुन्हा कामासाठी त्याच जागी येऊ नये हिच प्रार्थना होती. तिथे खूप अशा जागा आहेत. त्याची काही उदाहरणंही आमच्याकडे आहेत. रामोजी राव फिल्मसिटी जगातील भयावह जागांपैकी एक आहे”.
“रामोजी राव फिल्मसिटीमध्ये भुताटकी आहे. तिथे काम करत असताना देवाने मला वाचवलं. माझ्या नशिबाने मला तिथे वेगळं काही दिसलं नाही”. रामोजी फिल्म सिटीमध्ये काजोलने बऱ्याच चित्रपटांचं शूट केलं. या फिल्मसिटीमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट घडले. बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचं चित्रीकरणही इथे होतं. इतकंच काय तर अजय देवगणनेही इथे अनेक चित्रपटांचं चित्रीकरण केलं आहे.





