‘स्वदेस’ फेम बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशी व तिचा पती विकास ओबेरॉय यांचा काही दिवसांपूर्वी भीषण कार अपघात झाला होता. या अपघातात ते बचावले असले, मात्र दोन जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. अशातच, या अपघातानंतर गायत्री व तिचा पती भारतात परतल्याची बातमी समोर आली. (Gayatri Joshi and her Husband returns after Car Accident)
इटलीतील सार्डिनिया येथे आयोजित एका कार शर्यतीत गायत्री तिच्या पतीसह सहभागी झाली होती. त्यावेळी त्या दोघांच्या कारने एका व्हॅनला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पुढे असलेल्या फेरारी कारला धडक दिली. पुढे ती फेरारी कार व्हॅनला धडकल्यानंतर काही क्षणात कारने पेट घेतला. ज्यामुळे त्या कारमध्ये असलेल्या एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरु असून या भीषण अपघातानंतर अभिनेत्री तिच्या पतीसह मुंबईत परतले.
‘सीएनबीसी टीव्ही १८’ वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सूत्रांचे असे म्हणणे आहे की, इटलीतील कार अपघाताप्रकरणी विकास ओबेरॉय यांच्या विरोधात प्रथमदर्शनी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र या कार अपघातातील एक कार जी विकास चालवत होता, तिची चौकशी सध्या सुरु आहे. तसेच, या अपघातामागचे कारण शोधण्यासाठी इटलीतील परराष्ट्र विभागाने एका तांत्रिक तज्ज्ञाची नियुक्ती केली असल्याचे यात म्हणण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी ओबेरॉय रियल्टीच्या वतीने एक निवेदन जाहीर करण्यात आले. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “आमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय आणि त्यांची पत्नी गायत्री ओबेरॉय यांचा २ ऑक्टोबरला इटलीतील सार्डिनिया येथे अपघात झाला होता. देवाच्या कृपेने हे दोघे सुखरूप असून ते आज भारतात सुरक्षितरित्या परतले आहे.”
हे देखील वाचा – Video : लंडनच्या रस्त्यावर गौरव मोरेचा शाहरुख खान स्टाइल डान्स, ओपन बसमधील व्हिडीओ व्हायरल
यापूर्वी डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार, सार्डिनिया येथील सरकारी वकिलांनी या प्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली. जर विकास या प्रकरणी दोषी आढळला, तर त्यांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. आता या प्रकरणी आणखी काय खुलासे समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा – नागराज मंजुळेंच्या सुपरहिट ‘नाळ’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार, चित्रपटाच्या टीझरने वेधलं लक्ष
२००४ मध्ये शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ चित्रपटात गायत्री झळकली होती. मात्र, या चित्रपटानंतर अवघ्या काही वर्षात तिने उद्योगपती विकास ओबेरॉयसह लग्न केले आणि हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीचा पतीचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असून ते भारतातील सर्वात श्रीमंत टायकूनपैकी एक आहे. या दाम्पत्याला दोन मुले असून अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र आहे.