दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत सर्वच चित्रपटांना मागे सारत अव्वल स्थान पटकावले. मात्र, अनेकांनी या चित्रपटावर जोरदार टीकाही केलेली पाहायला मिळाली. कारण चित्रपटात पुरुषांनी स्त्रियांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रकार लोकांना आवडला नाही. अलीकडेच ‘लपता लेडीज’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका किरण राव यांनी यावर टीका केली होती. जेव्हा या चित्रपटाला वाईट चित्रपट म्हटले गेले तेव्हा संदीप रेड्डी यांनी चांगलेच खडसावले आणि सांगितले की, आधी तिने तिचा माजी पती आमिर खानचे चित्रपट बघावेत. यावर आता आमिर खाननेही माफी मागितली असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Aamir Khan Apologise)
संदीप रेड्डी वंगा यांनी ‘दिल’ चित्रपटातील दृश्याचा उल्लेख केला. ज्यामध्ये आमिर खान व माधुरी दीक्षित यांच्यातील भांडण दाखवण्यात आले आहे. यामध्ये आधी आमिरचे पात्र महिलेला मारते आणि धमकावते. तो तिच्यावर जबरदस्ती करतो आणि नंतर ते प्रेमात पडतात. ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत संदीप म्हणाला होता की, “मला त्या महिलेला सांगायचे आहे की, त्यांनी आमिर खानला या गाण्याबद्दल विचारावे. “खंबे जैसी खडी है…”, “उसके बाद मेरे पास आना” या गाण्याबाबत त्यांना आधी विचारा.
आता आमिर खानने त्या गाण्याबद्दल आणि पत्नीने केलेल्या भाष्याबद्दल माफी मागितली आहे. ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ‘आज तक’शी बोलताना आमिर खान म्हणाला, “हिंदी चित्रपट इतके जबाबदार नाहीत. विशेषत: ज्या प्रकारे महिला व पुरुष चित्रपटांमध्ये दाखवले जातात. जेव्हा आपण चित्रपटांमध्ये काही चुकीचे दाखवतो तेव्हा त्याचा परिणाम सकारात्मक होतो हेही आपण दाखवतो जे चुकीचे आहे. यात माझाही समावेश आहे. आणि मी असे चित्रपट केले आहेत. याची मला खूप लाज वाटते.
‘कॉफी विथ करण’मध्येही त्याने याबाबत माफी मागत म्हटलं की, “जगातील अनेक समाज पितृसत्ताक आहेत. भारत हा त्यापैकी एक आहे. आणि आम्ही आपण आपल्या चित्रपटांमध्ये महिलांवर ज्या प्रकारे आक्षेप घेतो, ते मी माझ्या सत्यमेव जयते या शोमध्येही सांगितले होते. खंबे जैसी खड़ी है, हे गाणे मी गायले आहे. ज्यामध्ये प्रत्येक वाक्यात महिलांना वस्तूंसारखे चित्रित करण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही जे करत आहोत ते खूप भयंकर आहे” असंही तो म्हणाला होता.