‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वाचा प्रवास आता अंतिम सोहळ्याच्या दिशेने सुरु झाल आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे पर्व अनेक कारणांनी गाजले. त्यापैकी एक कारण म्हणजे अंकिता लोखंडे व तिच्याकडून दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे सतत घेतले जाणारे नाव. या शोदरम्यान, अभिनेत्री अनेक वेळा सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख करताना दिसली. यामुळे तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. अंकिता हे सगळं सहानुभूती मिळविण्यासाठी करत असल्याचे अनेकांनी म्हटले होते.
अशातच नुकत्याच झालेल्या भागातदेखील तिला याबद्दल विचारण्यात आले. ‘बिग बॉस’च्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत घरातील सदस्यांना मीडियाच्या अनेक तीक्ष्ण प्रश्नांना सामोरे जावे लागले. यादरम्यान अकिंता लोखंडेला तिचा एक्स-बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल प्रश्न विचारण्यात आला. एका पत्रकाराने तिला “सुशांतचे नाव घेणे हा तुझ्या खेळाचाच एक भाग होता का?, जेणेकरून तुला त्याच्या चाहत्यांकडून सहानुभूती मिळेल?” असा प्रश्न विचारला.
यावर उत्तर देत अंकिता असं म्हणाली की, “अजिबात नाही. हे चुकीचे आहे. मी व अभिषेक नेहमी त्याच्याबद्दल बोलतो. आम्ही त्याला आदर्श म्हणून पाहतो. अभिषेकला सुशांतसारखं व्हायचं आहे. मी त्याच्याबद्दल नेहमीच चांगल्या गोष्टी बोलले आहे. ‘बिग बॉस’च्या या प्लॅटफॉर्मवरुन मी त्याच्याबद्दल काही चांगले बोलले असेल तर त्यात काय हरकत आहे? त्याने अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. मी त्याचा प्रवास जवळून पाहिला आहे. त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलले.”
दरम्यान, या घरातून विकी जैनचा प्रवास संपला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता घरात फक्त अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी व मुन्नवर फारुकी हे अंतिम लढतीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. येत्या २८ जानेवारी रोजी ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अनेक चाहते याची आतुरतेने वाट पाहत आहेत.