नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वातील विविध माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. त्याच्या ‘सही रे सही’ या नाटकाने तर रंगभूमी विशेष गाजवली. भरत जाधव आणि विनोद हे एक वेगळं समीकरणचं म्हणावं लागेल. मुबंईत लहानाचं मोठं झालेल्या भरतने मुंबईतील राहणीमानातील साधेपणा वैयक्तिक आयुष्यातही कायम जपला. पण भरतने या मुंबापुरीला अखेरचा रामराम केला आहे. (Bharat Jadhav On Kolhapur House)
मुंबई कायमची सोडून भरत जाधवने आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तो कुटुंबासह त्याच्या गावी कोल्हापूरला राहत आहे. लवकरच भरत जाधव यांचं ‘अस्तित्व’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने भरत जाधव यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान त्यांनी त्यांच्या कोल्हापुरातील घराविषयी ही भाष्य केलं. कोल्हापूर येथे घर का घेतलं आणि तिथे तो का स्थायिक झाला, याचा खुलासा भरतने या मुलाखतीदरम्यान केला आहे.
यावेळी बोलताना भरत म्हणाला, “माझ्या आई-वडिलांची इच्छा होती आपलं गाव कोल्हापूर आहे तर गावात एक घर किंवा फ्लॅट काहीतरी असावं. कोल्हापूरात आम्ही नेहमी पाहुण्यांकडे उतरायचो. त्यामुळे माझ्या आई-वडिलांनी मला कोल्हापूरात फ्लॅट किंवा घर बघ, असं सांगितलं. मी बंगला घेतला. अगदी फिल्मी पद्धतीने मी सुरुवातीला माझ्या भावांना बंगला दाखवला पण आई-बाबांना दाखवला नाही. मी बंगल्याचे व्यवहार केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला विमानाने घेऊन कोल्हापूरला गेलो. आमच्या घरात कोणाला विमानाचा प्रवास माहित नव्हता. मी कामानिमित्त काय ते विमान पाहिलं होत. पण घरात कोणालाच विमान प्रवास माहित नव्हता. म्हणून मुंबईहून विमानाने गेलो, त्यानंतर आमची शूटिंगची बस केली आणि थेट बंगल्यासमोर ती बस लावली. आणि सांगितलं हा आपला बंगला. तेव्हा वडिलांनी बंगला बघितला. त्यांची इच्छा होती की, तिथे पाहिजे कोणीतरी म्हणून मी आत्ता कोल्हापूरात राहतोय.”
यापुढे आई वडिलांच्या इच्छेबद्दल बोलताना भरत म्हणाला, “त्यानंतर त्यांची इच्छा होती की, जवळपास शेत बघ. तर मी विचारायचो तुम्ही करणार आहात का शेती? तर ते म्हणायचे, नाही रे, पाहुण्यात बोलायला बरं पडतं की आमचं शेत आहे. म्हणून मग मी ते शेत घेतलं. लॉकडाऊन मध्ये मी आणि माझा बायकोने त्या शेतातील रान उपटून त्या चार एकरच्या जमिनीत २०० आंब्याची कलमं, १०० नारळाची झाड लावली. त्या फार्महाऊसमध्ये मी नंतर राधा कृष्णाचं देऊळ बांधलं. आणि आई वडिलांचं स्मारक बांधलं.”