छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील कथानक व त्यात होणाऱ्या नवनवीन ट्विस्टने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नायिका असो किंवा खलनायिका, मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच्या मनात घर केली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकारांना त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे आजवर भरभरून प्रेम मिळालं आहे. असंच एक पात्र, जे अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेलं आहे. ते पात्र म्हणजे संजना. अभिनेत्री रुपाली भोसले संजना या पात्रातून नेहमी आपल्याला दिसत असते. तिने हे पात्र उत्तमरीत्या साकारलं असून तिच्या पात्राला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. सुरुवातीला खलनायिकेच्या रूपात दिसलेली रुपाली प्रेक्षकांना आता एका वेगळ्या रूपात पाहायला मिळत आहे. मालिकेबरोबर नाटक व चित्रपटांमध्ये झळकलेली रुपाली सध्या एका विशेष कारणामुळे आनंदी आहे. ते म्हणजे, तिला मिळालेला पुरस्कार. (Rupali Bhosale won Best Supporting Actress Award)
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली रुपाली कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशीच एक आनंदाची बातमी नुकतीच तिच्या चाहत्यांसमोर शेअर केली आहे. रुपालीला अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘विनाकारण राजकारण’ चित्रपटासाठी सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्याबद्दलची एक पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी दिली आहे.
रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटोज शेअर केले असून या फोटोमध्ये तिला मिळालेल्या पुरस्काराची झलक तिने दाखवली आहे. त्याचबरोबर एक पोस्ट लिहित तिने अनेक गोष्टींचा खुलासा करताना एक खंत व्यक्त केली. रुपाली या पोस्टमध्ये म्हणते, “सिनेमाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, सिनेमा हे larger than life असतं आणि ते अगदी खरं आहे. सिनेमा थिएटरमध्ये गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यांना जाणवतं, भव्य दिव्य थेटर, अगदी छान व आरामदायक सीट आणि खूप मोठा पडदा, ज्याच्यावर आपल्याला सिनेमा दिसतो. मोठमोठ्या स्पीकर्समधून आपल्याला साउंड आणि म्युझिक ऐकायला मिळतं. तीन तासांमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो, तसा अनुभव आपल्याला टेलिव्हिजनवर कधी मिळणार नाही. कारण टेलिव्हिजनचा पडदा छोटा असतो.”
हे देखील वाचा – लग्नाच्या पाच वर्षांनंतर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री रोशेल राव झाली आई, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हा प्रवास…”
पुढे ती म्हणते, “आजपर्यंत मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही सिनेमे का नाही करत किंवा तुम्ही आजपर्यंत सिनेमे का नाही केले? पण असं नाही की मला सिनेमा करायचा नव्हता. माझ्या वाट्याला सिनेमे आलेच नाहीत, आणि आले ते पण खूप मोजकेच. मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे. जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा “विनाकारण राजकारण” प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हा पुरस्कार मिळाला.”
हे देखील वाचा – ‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात, वृद्ध जोडप्याचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
“माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हा सिनेमाचा पुरस्कार आहे. ज्यावेळेला मी या क्षेत्रात यायचं ठरवलं, या क्षेत्रातला येण्याचा मार्ग अगदी थेटर मध्ये अंधारात जेव्हा आपण आपली सीट शोधत असतो, आपण चाचपडतो, थोडं धडपडतो आणि मग शेवटी आपल्याला आपली सीट मिळते. तसंच मी जेव्हा या क्षेत्रात आले त्यावेळेला चाचपडत नाटक क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथे मला माझी शीट मिळाली. मग सिरीयलच्या मार्गात चाचपडले आणि तीही माझी सीट आज मला मिळाली आहे. कदाचित हा जो सिनेमाचा पुरस्कार मला मिळालं आहे ते कदाचित एक संकेत असू शकतं.”, असं म्हणत तिने ‘विनाकारण राजकारण’च्या संपूर्ण टीमचे आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवलचे आभार मानले. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.