सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या बऱ्याच पसंतीस उतरताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही या मालिका अगदी पुढे असलेल्या पाहायला मिळतात. अनेक दिवसांपासून ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर होती. मात्र काही आठवड्यांपूर्वी आलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने कमी वेळेतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेने अवघ्या दोन आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत पहिला क्रमांक पटकवला असल्याचं बोललं जात आहे. यावर ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरी हीने प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.(jui gadkari on Marathi serial trp rating)
नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने टीआरपीच्या शर्यतबाबतच्या अव्वल स्थानाबाबत भाष्य केलं. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेनेही पहिल्या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान मिळवलं या विधानाला विरोध दर्शवत ती म्हणाली, “नाही, मुळात ही गोष्ट चुकीची आहे. कारण जे मुख्य रेटिंग येतात जे आम्हाला चॅनलकडून दिले जातात. त्याच्यामध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकाच पहिल्या क्रमांकावर आहे. कधी कधी वृत्तपत्र किंवा आणखी कोणी काही चुकीच्या गोष्टी प्रकाशित करतात. त्यांच्याकडे मुख्य रेटिंग नसतात. त्यामुळे असे गैरसमज होत राहतात. त्यांच्याकडे खरी बातमी नसते पण ठीक आहे”.
पुढे मालिकेच्या टिआरपीबाबत सांगताना ती म्हणाली, “माझ्यावर देवाची कृपा आहे की आल्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही टीआरपीचं पहिलं स्थान टिकवून आहोत. हे प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झालं आहे”, असं सांगत तिने प्रेक्षकांचे प्रेमासाठी व देत असलेल्या प्रतिसादासाठी त्यांचे आभार मानले.
आणखी वाचा – “भारत को छेडोगे तो…”, कंगना रणौतच्या ‘तेजस’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित
या दोन्ही मालिकांमध्ये आता टीआरपीच्या शर्यतीत कोण बाजी मारेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. कारण ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत वेगळंच वळण आलेलं दिसत आहे. मालिकेत खलनायिकेची एण्ट्री झाली असल्यामुळे आता ही मालिका कोणत्या वळणावर जाते हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्यामुळे यासर्व वळणांमुळे टीआरपीच्या शर्यतीत या दोन्ही मालिकांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.