बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने छाप पाडलेला अभिनेता म्हणजे रितेश विलासराव देशमुख. रितेश देशमुख हा स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आहे. रितेशने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नसला तरीदेखील त्यांचे दोन्ही भाऊ अमित व धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय आहेत. विलासराव देशमुख यांचे निधन होऊन आज इतकी वर्षे झाली असली तरीदेखील त्यांच्या आठवणीत त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हळहळतो आणि आज त्यांचा मुलगा रितेशही वडिलांच्या आठवणीत हळहळला.
लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी वडील विलासराव व त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या संबंधाबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भावूक झाला.
यावेळी वडील विलासराव व दिलीपराव या दोन भावांच्या नातेसंबंधाबद्दल बोलत असताना रितेशला अश्रु अनावर झाले. त्यांच्याविषयी बोलताना त्याने असं म्हटलं की, “विलासराव आणि दिलीपराव यांनी भाऊ म्हणून एकमेकांना जपलं. या दोन भावांनी एकमेकांपासून आपल्याला काय मिळेल? याचा कधीच विचार केला नाही”.
यापुढे रितेशने “आपल्या भावाला आपण कशी साथ देऊ शकतो, हाच संदेश विलासराव व दिलीपराव यांनी दिला. आज विलासराव यांना जाऊन जवळपास १२ वर्ष झाली…”, असं म्हणत असतानाच असे रितेशला गहिवरून आले आणि रितेश देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.
यावेळी त्यांना सावरण्यासाठी भाऊ अमित देशमुख पुढे आले आणि त्यांनी रितेश यांना सावरले. यानंतर काही वेळ थांबून रितेश देशमुख यांनी पुन्हा भाषण सुरू करत “आम्हाला वडिलांची उणीव भासू नये म्हणून काका नेहमीच मागे उभे राहिले” असंही म्हटलं.