दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी रवींद्र महाजनी यांच्या चौथा अंक या पुस्तकाचा नुकताच प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात माधवी यांनी त्यांच्या आयुष्यातील बरेच किस्से शेअर केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील चांगले वाईट, अनुभवही त्यांनी या पुस्तकातून मांडले आहेत. इतकेच नव्हे तर, माधवी यांनी या पुस्तकात रवींद्र यांच्याबरोबरची त्यांची लव्हस्टोरीही सांगितली आहे. रवींद्र महाजनी आणि त्यांची पत्नी माधवी यांचा प्रेमविवाह झाला होता. माधवी यांचं रवींद्र यांच्यावर जीवापाड प्रेम होत याच दर्शन घडविणारा एक किस्सा त्यांनी त्यांच्या या पुस्तकात सांगितला आहे. (Ravindra Mahajani Wife Shares Incident)
माधवी यांनी लिहिले आहे की, “एकदा मी कॉलेजमधून येत असताना रवी अचानक पुढ्यात आला. उदास, सैरभैर चेहरा करत म्हणाला, “काल मी जुगारात माझ्याकडचे सगळे पैसे हरलो. आणि ते मला वडिलांनी कॉम्प्युटर क्लासची फी भरण्यासाठी दिले होते.” तर, रवी मला म्हणाला, “आता जर मी अशा अवस्थेत घरी गेलो, तर दादा मला घरातही घेणार नाहीत. हाकलून देतील. काय करावं मला समजत नाही.” त्याचा निरागस चेहरा पाहून मला एकदम भरून आलं. मागचापुढचा काहीही विचार न करता, मी माझ्या हातातल्या सहा सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या. त्यानं बिनधास्त त्या बांगड्या घेतल्या आणि निघून गेला”.
यापुढे त्यांनी लिहिलं आहे की, “घरी गेल्यावर आईनं विचारलंच, ‘अगं, हे काय ? सोन्याच्या बांगड्या काय झाल्या तुझ्या?’. आईच बोलणं ऐकून मी गांगरले. सुचेल ती थाप ठोकली. म्हटलं, ‘अगं, लोकलमधे चढत असताना कुणीतरी माझ्या हातातून ओरबाडून घेतल्या. गर्दी इतकी होती की, काहीच करता आलं नाही मला.’ आईला पुष्कळ हळहळ वाटली, पण बिचारी गप्प बसली. आईशी कधीही खोटं न बोलणारी मी पहिल्यांदा व शेवटचं रवीच्या निरागस चेहेऱ्याकडे बघून खोटं बोलले. तिच्या कष्टाच्या पैशांनी तिने मला माझी हौस म्हणून या बांगड्या करुन दिल्या होत्या. आजही त्या आठवणीने मी दुःखी होते”.
हा किस्सा पुढे सांगत त्यांनी लिहिलं आहे की, “दुसऱ्या दिवशी मला रवीचा एक मित्र भेटला आणि त्याने मला विचारलं, ‘तू काल त्याला पैसे दिलेस का?’ मी चपापून ‘का?’ असं म्हटलं. ‘काल तो रात्रभर जुगाराच्या अड्ड्यावर होता आणि सगळा जुगार तो हरला, असं त्याने मला सांगितलं.अर्थात् त्यानंतर रवीनं स्वतः भेटून मला पुन्हा तितकाच निरागस चेहरा करुन सांगितलं, ‘आधीचे पैसे मिळवण्यासाठी मी तू दिलेल्या बांगड्या मोडून त्या पैशानं काल रात्रभर जुगार खेळलो, पण सगळेच पैसे हरलो”.
पुढे त्या असंही म्हणाल्या आहेत की, “आता या कर्माला काय म्हणावं ! हे एक दुष्टचक्र झालं होतं. तो कायमच हरायचा आणि हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा जुगार खेळायचा.आणि पुन्हा तेव्हाही हरायचे. मी रवीशी लग्न करु नये असं माझ्या मित्रमैत्रिणी तर सांगत होत्याच; पण खुद्द रवीच्या आईसुद्धा मला म्हणाल्या, ‘याच्याशी तू लग्न करु नकोस. याच्या सवयी चांगल्या नाहीत. आम्ही याला दोनदा घरातून हाकलून दिलेलं आहे. तुझ्यासाठी मी दुसरा चांगला मुलगा पाहीन. पण मी कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते”.