कलाक्षेत्रातील एक हरहुन्नरी अभिनेते, लेखक सतीश कौशिक यांनी ९ मार्च २०२२ रोजी जगाचा निरोप घेतला. सतीश यांच्या जाण्याने कलाक्षेत्रामध्ये जी पोकळी निर्माण झाली कधीही न भरुन निघणारी आहे. बॉलिवूडमधील अनेक हस्तींच्या तोंडी आजही त्यांचे नाव ऐकायला मिळते. त्यांचे सर्वात जुने मित्र अनुपम खेर हे आजही त्यांची आठवण काढत असतात. सतीश यांच्या निधनानंतर अनुपम हे त्यांच्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. नुकतेच अनुपम यांनी एका मुलाखतीमध्ये सतीश यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. (Anupam kher on Satish Kaushik)
अनुपम यांनी नुकतेच ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “सतीशच्या मृत्यूपूर्वी माझं त्यांच्याशी तीन तास आधी बोलणं झालं होतं. जेव्हा त्यांच्याशी बोलणं सुरु होतं तेव्हाच त्यांची तब्येत ठीक वाटत नव्हती. त्याचवेळी त्यांना रुग्णालयात भरती व्हावे असे सांगितले होते”. पुढे ते म्हणाले की, “मी त्यांना म्हणालो की जा रुग्णालयात भरती व्हा. रुग्णालयात नाही तर हॉटेलमध्ये राहायला जाताय असं समजा. त्यावर सतीश म्हणाले की, आता नको उद्या सकाळी जाईन. पण यावर त्यांचे काहीही न ऐकता लगेचच रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्याला मी म्हणालो की रुग्णालयात जा, आराम कर. रुग्णालयात जातोय असा विचार करु नका. असे समज मस्त एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झोपला आहेस”. हे त्यांच्यामधील शेवटचं बोलणं झालं असल्याचं अनुपम यांनी सांगितलं.
याबरोबरच अनुपम यांनी सतीश व त्यांच्या पहिल्या भेटीबद्दलदेखील सांगितले. अनुपम म्हणाले की, “१९७५ मध्ये एका ड्रामा स्कूलमध्ये आमची पहिली भेट झाली. मी तिथे बसलो होतो. तेव्हा ते माझ्याजवळ येत बाजूला बसले. मी त्यांना माझ्याजवळ का बसला आहात ? असे विचारले. तेव्हा मी १९-२० वर्षांचा होतो आणि माझ्याबाजूला मुलगी बसावी ,असं मला वाटत होतं. तसेच मी विचारले की, तुम्ही माझ्याजवळ बसलात तर मला काय मिळेल?. तेव्हा सतीश म्हणाले की, “मी हॉस्टेलमध्ये रहात नाही. इथेच जवळपास राहणारा मुलगा आहे त्यामुळे तुला पराठे खायला मिळतील असे ते मिश्किलपणे बोलले. त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो”. असे अनुपम यांनी सांगितले.
सतीश यांच्यासह अनुपम यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता त्यांचा शेवटचा चित्रपट ‘कागज-२’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.