‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षक विशेष पसंती देताना दिसत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणाने ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आशुतोष केळकरच्या जाण्याने अरुंधती खचलेली दिसत आहे. दरम्यान सुलेखा ताईंनी आशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरले आहे. त्यामुळे सुलेखा ताईंच्या मनातून अरुंधतीची जागा कमी झाली आहे. तसेच त्यांनी केळकरांच्या घरातून अरुंधतीला जाण्यासही सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अरुंधती देशमुखांच्या घरी राहत आहे. (Aai Kuthe Kay Karte Promo)
अशातच मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. मालिकेत सध्या गुढीपाडवा विशेष भाग पाहायला मिळत आहे. देशमुखांच्या घरी दोन गुढी उभारल्या गेल्या. संजना तिचा तिचा वेगळा गुढीपाडवा साजरा करताना दिसली. तर आता इशाही केळकरांच्या घरी राहायला आलेली असते. इशाला अनिशच प्रेम मिळवायचं असतं म्हणून तिची धडपड सुरु असते. इशा आणि अनिश गुढीपाडवा साजरा करतात. तेव्हा अरुंधतीही तिथे येते. मात्र अरुंधती आलेली सुलेखा ताईंना आवडत नाही. त्या अरुंधतीला पाहून जेवणाच्या ताटावरून उठून जातात. तेव्हा अरुंधतीला रडू येत आणि ती निघून जाणार इतक्यात अनिश तिला अडवतो.
तेव्हा इशाही अरुंधतीवर चिडते. इशा अरुंधतीला केळकरांकडे आल्याबद्दल तिला दोष देते. इशा अरुंधतीला दोष देत, “तू इथे का आलीस. तुला माझं सुख पाहवत नाही का?, मी अनिशच प्रेम पुन्हा मिळवायचा प्रयत्न करतेय. या घरात माझं स्थान निर्माण करायचा विचार करत आहे. आम्हाला सुखाने जगू देणार आहेस का?, तू इथून जा. तुझ्या आयुष्यातून सुख निघून गेलं आहे, पण आम्हाला सुखात राहू दे”, असं बोलते.
यावर अरुंधती सगळ्यांना शांत करते. अरुंधती म्हणते हे माझं आणि आशुतोषच घर आहे. या घरात शांतता राखा. बोलणार असाल तर प्रेमाचे चार शब्द बोला. सर्वांचं आपुलकीने स्वागत करा. या घराला भांडणाचा नाहीतर सुरांची सवय आहे. सुखाने संसार कर. या घराला, सुलेखा ताईंना आणि अनीशला सांभाळ”, असं सांगते. त्यांनतर पुन्हा इशा अरुंधतीला बोलते, “मी सगळं सुखासाठीच करत होते. तूच या आनंदात मिठाचा खडा टाकलास. माझी आता एकच विनंती आहे, कृपया तू या घरात पुन्हा येऊ नकोस”, असं बोलते. यावर अरुंधती पुन्हा कधीच येणार नाही असं म्हणत निघून जाते.