सध्या ‘आई कुठे काय करते’ ही मालिका चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. गेली सव्वा चार वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेत वेळोवेळी आलेल्या ट्विस्टमुळे ही मालिका काहींच्या पसंतीस पडतेय तर काहीजण मालिकेला ट्रोल करत आहेत. अशातच मालिकेच्या समोर आलेल्या एका प्रोमोने ही मालिका ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडली आहे. मालिकेतील अरुंधतीचा नवरा आशुतोष केळकर या पात्राचा मृत्यू दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हे पात्र साकारणारा अभिनेता ओंकार गोवर्धन मालिकेतून एक्झिट घेणार आहे. (Milind Gawali On Omkar Gowardhan)
ओंकार मालिकेत नसणार ही गोष्ट त्याच्या मालिकेतील कलाकारांनाही पचवता आली नाही. सगळ्यांना ओंकारच्या जाण्याने दुःख झालं आहे. अशातच अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी ओंकारसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत ओंकारच कौतुक करत त्यांनी म्हटलं आहे की, “ओंकार गोवर्धन याने आशुतोष केळकर या भूमिकेची कात टाकली. तीन साडेतीन वर्षांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये अरुंधती दुसरं लग्न करणार तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्युस होणार याची उत्सुकता होती. अचानक एक दिवस ओंकार गोवर्धन आणि माझी गाठ आमच्या मालिकेच्या सेटवर जिन्यामध्ये झाली. मी ओमकारला पाहिल्या पाहिल्या म्हटलं अरे आपण तर आधी भेटलो आहोत, गजेंद्र अहिरे यांनी मला एकदा त्याच्या सिनेमाच्या ट्रायल शोसाठी बोलावलं होतं. तो सिनेमा होता ‘निळकंठ मास्तर’ त्या निळकंठ मास्तरच्या भूमिकेमध्ये ओमकार गोवर्धन होता आणि मला त्याचं काम अतिशय आवडलं होतं”.
“तोच मुलगा आता माझ्यासमोर आशुतोष केळकरच्या भूमिकेसाठी आला होता. मला त्याला बघून आनंद झाला, कारण माझा नमितावर खूप विश्वास आहे, तिचं कास्टिंग कधी चुकत नाही, मी ओमकारला शुभेच्छा दिल्या आणि त्याला म्हटलं ‘वा मजा येणार आता, मला खात्री आहे तू छानच काम करशील’. आणि अगदी तसंच झालं ओमकार ने इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या छान पद्धतीने आशुतोष केळकर ही भूमिका निभावली की, तो सगळ्यांचा लाडका झाला. मी आणि आप्पा ज्या मेकअपरुममध्ये होतो त्याच मेकअपरुममध्ये ओमकारची सोय करण्यात आली आणि ओमकार आल्या दिवसापासून त्या मेकअप रुममध्ये फक्त कला, मस्ती आणि हास्य रसाचा वर्षाव झाला”.
“विनोद काय असतं, हे ओमकार कडून शिकावं. सतत प्रसन्न राहणे, हसत राहणे आणि समोरच्याला हसवत राहणे हा त्याचा हातखंडा, पण एकदा का स्क्रिप्ट हातात आली की ती पाठ करायची, त्याच्यावर म्हणून चिंतन करत राहायचं, डोक्यात जितके प्रश्न येतात ते दिग्दर्शकाला विचारुन त्याचं निरसन करायचं, एखाद्याचं वाक्य चुकलं, शब्द चुकला किंवा त्याचा अर्थ बदलला, तर प्रथम त्याला ते लक्षात यायचं, पाठांतराच्या बाबतीत त्याचा हात कोणीच धरु शकत नव्हतं, त्याची तर असंख्य सिनेमांची गाणी सुद्धा तोंड पाठ असायची. कधी कधी मेकअप रुममध्ये आप्पा ,अनीश आणि त्याच्या त्या गाण्यांच्या मैफिली व्हायच्या बरेचदा मी पण त्यात सामील व्हायचो”.
“आता आशुतोष केळकर मालिकेत नसणार याचा मला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसला आहे. मला माहिती आहे की, मी त्याला खूप खूप मिस करणार आहे. जसे लहानाचे एकत्र मोठे झालेले दोन भाऊ अचानक एक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाला की त्या दुसऱ्या भावाची जी अवस्था होत असेल, तशाच काहीश्या भावना आहेत. पण त्याचं भाषेवरचं प्रभुत्व, त्याची अभिनयाची जाण, आणि त्याचं व्यावसायिक असणं त्याला आयुष्यामध्ये अजून खूप मोठं करणार अशी माझी खात्री आहे”.