‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून चांगलेच चर्चेत आले आहे. यामध्ये अनेक सदस्य असे आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली होती. यावेळी तिसऱ्या पर्वामध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर, कलाकार, युट्यूबर यांचा समावेश आहे. काही सदस्यांमुळे नाराजीदेखील आहे. दिल्लीतील प्रसिद्ध ‘वडापाव गर्ल’च्या सहभागाने अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने संताप व्यक्त केला होता. अशातच आता पुन्हा एकदा देवोलीनाने युट्यूबर अरमान मलिकबद्दल भाष्य केले आहे. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींबरोबर सहभागी झाला आहे. शोच्या पहिल्या दिवशी अरमान व त्यांच्या बायकांना प्रेम कहाणी विचारली होती. (devoleena bhattacharjee on youtuber armaan malik)
अरमान, पायल व कृतिका यांनी त्यांची प्रेमकहाणी टेलिव्हिजनवर सांगितली होती. हा व्हिडीओ देवोलीनाने शेअर करत भाष्य केले आहे. तिने सोशल मीडियावर लिहिले आहे की, “हे मनोरंजन आहे असं तुम्हाला वाटतं का? हे मनोरंजन नाही घाण आहे. याकडे दुर्लक्ष करु नका. हे रील नाही खरं आहे. मला हे समजत नाही की इतक्या निर्लज्जपणे याला मनोरंजन कसे बोलू शकता. मला हे सगळं ऐकून खूप घाण वाटत आहे. केवळ सहा-सात दिवसांत प्रेम, लग्न झालं तसंच तिच्या मैत्रिणीबरोबरही झालं. हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचं आहे”.
पुढे ती म्हणाली की, “आणि बिग बॉस तुम्हाला काय झालंय? तुमचे इतके वाईट दिवस आले आहेत का की ज्यांनी एकापेक्षा अधिक लग्न केली आहेत त्यांना कार्यक्रमात घ्यावे लागले. एकापेक्षा अधिक लग्न करु शकतात आणि एकत्र खूप गुण्यागोविंदाने राहू शकतात असे नवीन पिढीला सांगायचे आहे का?”, देवोलीनाप्रमाणानेच इतर लोकही अरमानवर भडकले आहेत. तसेच त्याला सोशल मीडियावर ट्रोलदेखील करत आहेत.
दरम्यान देवोलीनाच्या स्टोरीवरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. तसेच बिगबॉस ओटीटीवरही मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. देवोलीनादेखील टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’मध्ये दिसून आले होती. ते पर्वदेखील देवोलीनाने खूप गाजवलं होतं.