मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून अभिनेता अभिजीत खांडकेकरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकाविश्वामुळे अभिजीतला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या अभिजीत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेमुळे अभिजीत प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. आता बिनधास्त अभिनय करणारा, सूत्रसंचालनाची धुरा पेलवणारा अभिजीत लहानपणी नेमका कसा होता याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Abhijeet Khandkekar Childhood Memory)
अभिजीतने नुकतीच भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा, मस्ती पॉडकास्ट’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिजीतने लहानपणी त्याला भाषेमुळे व दिसण्यामुळे कसा न्यूनगंड वाटायचा याबाबत खुलासा केला. यावेळी बोलताना अभिजीत म्हणाला, “मी बीड परभणीला होतो तेव्हा साधारण पाचवी सहावीत होतो. इयत्ता सहावीमध्ये मी नाशिकला आलो. कारण बाबांना तेव्हा असं वाटत होतं की, आमचं शिक्षण चांगल्या ठिकाणी व्हावं. बीड-परभणीसारख्या ग्रामीण भागात मी बराच काळ घालवला, त्यामुळे माझे उच्चार, माझा लहेजा हा बऱ्यापैकी ग्रामीण होता. त्यात मी वयात येत असल्यामुळे माझा आवाज चिरकायचा, चेहऱ्यावर खूप पिंपल, अत्यंत बारीक दिसायचो. त्यामुळे आपण बरे दिसत नाही, आपला आवाज बरा नाही, आपल्याला नीट बोलता येत नाही, आपली भाषा, उच्चार नीट नाहीत, असं मला वाटायचं. मला तेव्हा परभणीची भाकर म्हणून चिडवायचे”.
पुढे तो म्हणाला, “तेव्हा तो बराच काळ असा होता, कारण शुद्ध तुपाला पिवर तूप असंच म्हटलं जायचं. तिकडे सगळे लोक पिवर म्हणतात. मराठवाड्यातले काही उच्चार युनिक आहेत. हातरुमालाला दस्ती म्हणतात, बादलीला बकेट म्हणतात. बीड, परभणीमध्ये म्हणजेच आमच्या घरी अशी भाषा बोलली जायची. शहराकडे आल्यानंतर याच भाषेवर हसलं जायचं. मला असं झालं की, आपलं काहीचं बर नाही आहे का?, मराठी जाऊदे, पण इंग्रजी माध्यमांमध्ये त्याकाळी पाचवीपासून एबीसीडी शिकवायचे. इंग्रजी येत नाही, हिंदी येत नाही, मराठी येत आहे पण त्यावरही हसतायत आपल्याला सगळे, त्यामुळे मी खूप घाबरून गेलो होतो”.
ही भीती कशी घालवली याबाबत बोलताना तो म्हणाला, “साधारण सातवी आठवीचा काळ माझ्यासाठी फार वाईट होता. अर्थात नंतर मित्र झाले. त्यांच्यात मैत्री झाली. त्यावेळी मला एक चपराक बसली. मग मी कोण कसं बोलतं याचं निरीक्षण करू लागलो. उच्चार नीट ऐकू लागलो. काही कळत नसलं तरी इंग्रजी वर्तमानपत्रे वाचू लागलो. त्यावेळी मी शिकलो. सगळं वाचायला लागलो. तेव्हा मी ठरवलं होतं, आता मी माझी भाषा बदलूनच राहणार. हा भयंकर न्यूनगंड त्याकाळी माझ्यामध्ये काही काळ होता. मी आज जो काही आहे तो या गोष्टींमधून मी शिकलो म्हणून आहे, असं मला वाटतं”.