सध्या बॉक्स ऑफिसवर ‘अॅनिमल’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत या चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. रणबीर कपूर अभिनित या चित्रपटात इतर कलाकारांच्याही भूमिका तितक्याच गाजल्या. चित्रपटात रणबीरपेक्षा भाव खाऊन गेली ती बॉबी देओलची भूमिका. मूकअभिनय साकारत बॉबीने या चित्रपटात खलभूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका विशेष गाजली. आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांनी त्याच्या या भूमिकेला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. (Bobby Deol On Animal)
बॉबी देओलने अभिनेता म्हणून नव्व्दच्या दशकात सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्याला हवं तसं यश मिळालं नाही. त्यांनतर ‘आश्रम’ या वेबसीरिजमधील त्याच्या भूमिकेने अभिनेत्याचं नशीब चमकलं. ‘आश्रम’मध्येही बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘अॅनिमल’ हा चित्रपट बॉबी देओलच्या पदरात पडला. आणि अभिनेत्याचे नशीब फळफळले. ‘अॅनिमल’मध्ये साकारलेली अबरार ही खलभूमिका विशेष चर्चेत आली.
या चित्रपटाबाबत बॉबी देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला मिळालेल्या यशाचे श्रेय त्याने पत्नी तान्या देओलला दिले. या मुलाखतीदरम्यान त्याने पत्नीला काम करण्यापासून कधीही रोखले नसल्याचेही सांगितले. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलने सांगितले की, “तो खूप मोकळ्या मनाचा आहे. त्याचे वडील धर्मेंद्र यांच्यासारखा नाही”. तो असंही म्हणाला की, “आपल्या वाढत्या वयात त्याचे त्याच्या वडिलांशी फारसे चांगले बॉण्डिंग नव्हते. मात्र त्याचे त्याच्या मुलांशी असे संबंध नाहीत”.
बॉबी यापुढे म्हणाला, “जेव्हा मी मोठा होत होचो तेव्हाचा काळ वेगळा होता. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचा आदर ठेवायचा होता. आपण काही गोष्टींच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या आईशी भांडू शकत होता, पण वडिलांशी नेहमी संकोच ठेवून वागावे लागत असे. पण ही गोष्ट माझ्या मुलांबरोबर घडली नाही. यात माझ्या वडिलांचा दोष नाही कारण ते त्याच वातावरणात वाढले आहेत, पण मी खूप मोकळ्या मनाचा माणूस आहे. मी माझ्या पत्नीला कधीही काम करण्यापासून रोखले नाही किंवा तिला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला नाही वा तिला स्वतःला कमीपणा येईल, असे वाटू दिले नाही. मी जे काही आहे ते माझ्या पत्नीमुळेच आहे” असंही तो म्हणाला.