मंगळवारचा दिवस विराट कोहलीसाठी सोनेरी क्षणांनी नटलेला ठरलेला. IPL मध्ये तब्बल १८ वर्ष विराट फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) टीमकडूनच खेळला. मात्र या वर्षांमध्ये आरसीबीचं आयपीएल ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. अखेरीस विराटने सातत्याने एकाच टीममध्ये खेळत आरसीबीला आयपीएलची पहिली ट्रॉफी मिळवून दिली. पंजाब किंग्ज विरोधात सामना जिंकताच विराटच्या डोळ्यांमध्ये अश्रूच्या धारा लागल्या. अर्थात १८ वर्षांची मेहनत आणि त्यानंतर हाती आलेलं यश याचा तो आनंद होता. स्टेडियममध्ये उपस्थित असलेली हजारो मंडळी विराट, आरसीबीच्या नावाने ओरडत होते. विराट आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी हे सारं सारं काही स्वप्नवत होतं. दरम्यान विराटला मिळालेल्या यशानंतर प्रेमानंद महाराज यांचीही चर्चा सुरु आहे. (Virat kohli connection with premanand maharaj)
विराटने काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला. त्याने कसोटी सामन्यांमधून निवृत्ती घेतली. त्याचा हा निर्णय सगळ्यांसाठीच धक्कादायक होता. निवृत्तीनंतर विराट पत्नी अनुष्का शर्मासह थेट वृंदावनला पोहोचला. तिथे जाऊन त्याने प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रेमानंद यांच्याबरोबर साधलेला संवाद आणि त्यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आरसीबीचं यश म्हणजे प्रेमानंद महाराज यांचा आशिर्वाद अशा चर्चा आता सुरु झाली आहे.
प्रेमानंद महाराजही विराटसह ट्रेंड होत आहेत. विराट व अनुष्काचा वृंदावनमधील व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. २००८मध्ये आयपीएलचे सामने सुरु झाले. तिथपासून विराटला कधीच ही ट्रॉफी मिळवता आली नाही. तीन वेळा फायनलपर्यंत आरसीबीने मजल मारली. पण हाती अपयशच आलं. आता प्रेमानंद महाराज यांचा आशिर्वाद घेतल्यानंतर विराटला यश मिळालं असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरही पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
२०२३मध्ये विराट अनुष्कासह पहिल्यांदा प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनाला गेला होता. प्रेमानंद यांना भेटण्यापूर्वी विराटच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार सुरु होते. भेट घडण्यापूर्वीच करिअरमधील त्याचा वाईट काळ सुरु होता. पाच टेस्ट मॅचमध्ये केवळ १९० धावा त्याने बनवल्या. त्यामुळे विराटने आता निवृत्ती घ्यावी असं सातत्याने लोक म्हणत होते. मात्र प्रेमानंद महाराजांच्या भेटीनंतर त्याचं करिअरही प्रगती पथावर आलं असा दावा अनेकांनी केला आहे. श्रीलंका विरोधात झालेल्या एका मॅचमध्ये त्याने तीन वर्षानंतर शतक पटकावलं. हे सगळं प्रेमानंद महाराजांच्या भेटीनंतर घडत होतं. आता प्रेमानंद महाराज यांच्या भेटीला विराट जात असतो. त्याच्यासह अनुष्काही अध्यात्मिक मार्गाकडे वळली आहे.