नशिबी पैसा, प्रसिद्धी असूनही कलाकार मंडळींच्या मनात मानसिक सुखाचं काय? असा प्रश्न डोकावतो. खासगी आयुष्यातील काही प्रश्नांमुळे कलाकारांना एकटेपणा सहन करावा लागतो. याचंच मुख्य कारण म्हणजे घटस्फोट. कलाक्षेत्रातील मंडळींचं घटस्फोटाचं प्रमाण काही अंशी वाढलं असल्याचं बोललं जातं. आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खानच्या नशिबीही असाच एकटेपणा आला. इमराव व अवंतिकाने एकमेकांना जवळपास ९ वर्ष डेट केलं. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०११मध्ये इमरान व अवंतिकाचं थाटामाटात लग्न झालं. मात्र २०१९मध्ये त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन थांबलं. दोघांना गोंडस मुलगीही आहे. याचबाबत आता इमरानची पत्नी अवंतिकाने भाष्य केलं. घटस्फोटाबाबत उघडपणे ती बोलली. (avantika malik on divorce with imran khan)
नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत अवंतिकाने म्हटलं की, “मला खूप भीती वाटायची. मी स्वतःला सांभाळू शकणार की नाही असं सतत वाटायचं. एकटं राहणं म्हणजे मृत्यूच आहे असं वाटत होतं. घाबरुन मी स्वतःला तर काही करुन घेणार नाही ना असे विचार मनात यायचे. मी आता मरणार असं वाटत होतं. क्लिनिकल डिप्रेशनमध्येच मी होते. जिथे फक्त मला मरण दिसायचं. आज मी इथे बसली आहे. असं मी कधी भविष्यात चांगली राहिन असं मला तेव्हा वाटलंच नव्हतं”.
“आता मी एखादी गोष्ट बोलली आणि ते लगेचच केलं असं मी कधीच करु शकत नाही. यामागचं कारण म्हणजे मी खूप भावुक आहे. दुसरं कारण म्हणजे माझ्या आई-वडिलांचं लग्नही यशस्वी झालं नाही. त्यामुळे माझं लग्न यशस्वी झालंच पाहिजे हा दबाव आहे माझ्यावर आहे की काय असं सतत मला वाटत होतं. बालपणामध्ये मी जे सहन केलं ते माझ्या भविष्यात घडू नये असं मला वाटत होतं. हिच भीती माझ्या मनामधून कधीच लांब गेली नाही”.
२०१९मध्ये एका मुलाखतीत इमरान खाननेही अवंतिकाबरोबर झालेल्या घटस्फोटाविषयी भाष्य केलं होतं. तो म्हणालेला, “मानसिक आणि शारिरीकरित्या मी स्वतःला कमकुवत समजत होतो. अंथरुणातून उठून ब्रश करणंही मला एक टास्कच वाटायचा. मी स्वतःला एका खोलीमध्ये बंद केलं होतं”. इमरान व अवंतिकाने समजुतदारपणाने एकमेकांपासून कायमचं दूर राहण्याचा निर्णय घेतला. आता दोघंही आपापलं आयुष्य अगदी आनंदाने जगत आहेत.