अभिनेत्री विशाखा सुभेदारने आजवर तिच्या विनोदी अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनात घर केलं. प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांच्या यादीत विशाखा सुभेदारच नाव आवर्जून घेतलं जात. छोटा पडदा गाजवणाऱ्या विशाखा सुभेदारला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. विशेषतः जाड दिसण्यावरून अनेकांनी तिला ट्रोल केलं. जाड असण्यावरून केलेला विनोद कितीसा योग्य आहे याबाबत विशाखा सुभेदारने इट्स मज्जा या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Vishakha Subhedar On Obesity)
“जाड असण्यावर सतत विनोद होत असेल तर राग येतो का?” असा प्रश्न विशाखाला विचारण्यात आला. यावर विशाखा म्हणाली, “हो राग तर येणारच. एखाद्या वर्मावर बोट ठेवणं हे कोणाला आवडणार आहे. एकदा, दोनदा, तीनदा विनोद ठिक आहे पण त्यापुढे सहन होऊ शकत नाही. शेवटी माणूस आहे. माणसाला लोभ, क्रोध सगळ्या भावना आहेत. त्यामुळे राग हा येणार. विनोद म्हणून किती टाळायचं? आत विनोदाचेही बरेच प्रकार आहेत. अपमान व विडंबन असा विनोदाचा प्रकार आहे.
यापुढे बोलताना विशाखा म्हणाली, “एखाद्याचा अपमान यावरच संपूर्ण डोलारा उभा असतो. हाच होणारा अपमान कुठेतरी घातक आहे. पूर्वी साधा-सरळ विनोद असायचा. एखाद्या विषयावर आधारित विनोद तयार व्हायचा. आता कोणाचा अपमान केल्याशिवाय कोणाला चैन पडत नाही. हा बोलला कसा नाही?, याची मारली कशी नाही? यावर बोलल्यानंतर चार लोक हसले की त्यांना बरं वाटतं. हाच प्रकार कुठेतरी कमी झाला पाहिजे. कलाकाराची कला ही समाजाला काहीतरी देणं लागतं.”
विशाखा पुढे असंही म्हणाली की, “एखादा विचार, दृष्टीकोन समाजाला दिला पाहिजे. पण कोणाचा अपमान करुन विनोद केलेला नसावा. थोडी चव म्हणून अशाप्रकारचा विनोद ठिक आहे पण संपूर्ण जेवणच अपमानाचं नसावं. असं मला खूप वाटतं”.