‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची जागा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका घेणार आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली ही नवी मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा शेवटचा भाग आज प्रदर्शित होणार आहे.
या मालिकेचा प्रवास आता संपत असल्यामुळे मालिकेबद्दलच्या काही खास आठवणी शेअर करत कलाकार भावुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर मालिकेबद्दल व मालिकेतील कलाकारांबद्दलच्या काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे कलाकारांबरोबरच्या खास आठवणींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हआ व्हिडीओ शेअर करत त्याने असं म्हटलं आही की, “प्रत्येक मालिकेच्या निमित्तानं कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं. त्यांच्याबरोबर आम्ही हसतो, रडतो, भांडतो, खिदळतो आणि अचानक एके दिवशी आता उद्याचा कॉलटाइम येणार नाही. “ए तू उद्या किती वाजता?”, “आज डब्यात तूझ्यासाठी खास आणतेय हा..”, “च्यायला ट्राफिक लागला यार खूप” “चलो चलो जल्दी घर जाना है..” हे सगळे संवाद आता बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही”.
पुढे अभिजीतने कलाकारांबद्दल व्यक्त होताना असं म्हटलं आहे की, “पण आम्हा कलाकारांचं हे असंच असतं. तरीही ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या निमित्ताने तयार झालेले हे बंध आयुष्यभरासाठी आहेत. अवनी तायवडे, अवनी जोशी म्हणजेच स्वरा आणि पिहूने मला बापपणाचा अनुभव दिला. कांचन गुप्तेने आईसारखी माया दिली. सचिन, उमेश, शैलेश, हार्दिक, विघ्नेश, केदार, प्रथमेश, सागर, अभिजीतच्या रूपात भाऊ मिळाले. पल्लवीसारखी आदर्श वहिनी, बहीण मिळाली. प्रिया, तेजस्विनी, उर्मिलासारख्या आयुष्यभराच्या मैत्रीणी मिळाल्या. प्रत्येकाबद्दल भरपूर लिहीता येईल. पण ते लिहीण्यापेक्षा एका कडकडीत मिठीतून जास्त नीट पोहोचेल”.
आणखी वाचा – “जे घडले ते…”, निखिल पटेलवर दलजीत कौरच्या मैत्रिणीचे गंभीर आरोप, म्हणाली, “या माणसाने तिच्यावर अन्याय…”
यापुढे अभिजीतने मालिकेबद्दल भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “‘तुझेच मी गीत गात आहे’च्या निमित्ताने वडील व मुलीची शेवटी भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग आज ‘फादर्स डे’च्या निमित्ताने प्रसारीत होत आहे, याहून अनोखा योगायोग अजून कुठला. पुन्हा नव्या भुमिकेतून आपल्या समोर येत राहीनच. तोपर्यंत असंच प्रेम आणि आशिर्वाद असू द्या”. दरम्यान, या व्हिडीओखाली चाहत्यांनीही “या मालिकेची आठवण येईल”, “खूप छान मालिका होती”, “तुम्ही कायम आठवणीत राहाल” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.