मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. काही कालावधीसाठी सुरु असलेल्या मालिका एक ना एक दिवस प्रेक्षकांचा निरोप घेतात. अशातच प्रेक्षकांची एक लाडकी मालिका निरोप घेत असल्याची बातमी समोर आली आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एकत्र कुटुंब पद्धतीवर अवलंबून असलेल्या या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. (Supriya Pathare Emotional)
या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अभिनेते शरद पोंक्षे, उदय टिकेकर, चेतन वडनेरे, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, सुप्रिया पाठारे, लीना भागवत, सारिका निलाटकर-नवाथे, नम्रता प्रधान अशा अनेक तगड्या कलाकार मंडळींनी मालिकेतील आपापली पात्र उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशी अनेक पात्र प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटली. मालिका निरोप घेणार असल्याने मालिकेतील कलाकार भावुक झालेले पाहायला मिळत आहेत.
मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होणार असून त्यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी आपले अनुभव सांगितले आहेत. हे अनुभव सांगतानाचा कलाकारांचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या मालिकेने दिलेलं प्रेम, मालिकेदरम्यानच्या प्रवासाबाबत बोलत कलाकार मंडळी या व्हिडिओमधून व्यक्त झाले आहेत. यावेळी सुप्रिया पाठारे यांनी मालिकेतील कलाकारांनी दिलेल्या आधाराबद्दल भाष्य केलं.
सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या चित्रीकरणासाठी मला जायचं होतं. तेव्हा मला ११चा कॉल टाईम देण्यात आला होता, आणि त्याच दिवशी सकाळी ८ वाजता माझी आई गेल्याचं कळलं. आणि त्यावेळेला वा त्यादिवशी शूटिंगला येणं शक्य नव्हतं. तेव्हा माझ्या या सर्व मुली शुटिंगसंपल्यानंतर माझ्याजवळ आल्या आणि मला त्यांनी मानसिक आधार दिला. दुसऱ्या दिवशी मी चित्रीकरणाला आले तेव्हाही सेटवर त्याबरोबरचं होत्या. मुलांवर प्रेम कायमचं असतं पण या मालिकेमुळे मुलांवर प्रेम करायचं अधिक वाढलं आहे. आता माझी बरीच मुलं आहेत. माझ्या घरची तसेच आता मालिकेतील ही सर्व मुलं एकत्र झाली आहेत. आणि मुलांच्या वाढत्या संख्येनुसार माझं त्यांच्यावरील प्रेमही जास्त वाढलं आहे”.