नाटक, चित्रपट व ओटीटी माध्यमांमधून उल्लेखनीय काम करणारे ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह अभिनयाबरोबरच त्यांच्या बेधडक स्वभाव व वक्तव्यासाठी सुद्धा ओळखले जातात. मात्र, सध्या ते त्यांच्या ‘गदर २’, ‘काश्मीर फाईल्स’ व ‘द केरला स्टोरी’ सारख्या चित्रपटांवर केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहे. त्यांच्या या वक्तव्याला काहींनी दुजोरा दिला असला, तरी बऱ्याच जणांनी मात्र अभिनेत्याच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. अशातच ‘काश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकानंतर आता ‘द केरला स्टोरी’चे दिग्दर्शक व अभिनेत्रीने यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. (The Kerala Story Director on Naseeruddin Shah’s Statement)
‘फ्री प्रेस जर्नल’ या वृत्तपत्राशी संवाद साधताना नसीरुद्दीन शाह यांनी असं वक्तव्य केलं होतं की, “मी ‘द केरला स्टोरी’ किंवा ‘गदर २’सारखे चित्रपट पाहिलेले नाहीत. पण त्यात नेमकं काय दाखवलं जातंय, ते मला चांगलंच ठाऊक आहे. ही फार चिंताजनक बाब आहे की, ‘काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट हिट होत आहेत. पण सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांचे चित्रपट प्रेक्षक पाहत नाहीत. त्यामुळे या दिग्दर्शकांनी या गोष्टींमुळे न डगमगता त्यांचे चित्रपट लोकांसमोर आणायला पाहिजेत असं मला वाटतं.”
त्यांच्या या वक्तव्यावर आधी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या दिग्दर्शकासह अनेकांनी टीका केली होती. आता ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन व चित्रपटातील मुख्य कलाकार अदा शर्मा यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले, “एक माणूस चित्रपट न बघताच त्यावर भाष्य करतो हा केवळ मूर्खपणा आहे. आम्ही त्यांचा आदर करतो पण त्यांनी थोडं जबाबदारीने भाष्य करायला हवं होतं. मी गेली १० वर्षं या सृष्टीत काम करत आहे. आमच्या ‘द केरला स्टोरी’ला दोन महिन्यांनी नीट अभ्यास करून सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालं. जर चित्रपटात तसं काही आपत्तीजनक काही असतं तर त्यांनी चित्रपट पुढे जाऊच दिला नसता, पण ठीक आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे, पण ही अत्यंत बालिश वृत्ती आहे.”
हे देखील वाचा – Video : निवेदिता सराफ यांनी बनवले ‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवरच मोदक, व्हिडिओ व्हायरल
तर चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अदा शर्मा यावर म्हणाली, “माझ्या घरच्यांनी सगळ्यांच्या मताचा आदर करायला शिकवलं आहे. आमच्या चित्रपटाला ज्याप्रकारे लोकांनी डोक्यावर घेतलं, तेच माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जर कुणी चित्रपट न बघताच त्यावर भाष्य करत असेल तर तेदेखील मला मान्य आहे. ते इंडस्ट्रीतील ज्येष्ठ कलाकार आहेत अन् त्यांच्या मताचा मी आदरच करते. आपल्याला जे वाटेल ते मत आपण मांडू शकतो, अशा देशात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे.”
हे देखील वाचा – १८व्या वर्षी केलं लग्न अन् वर्षभरातच झाला घटस्फोट, सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानचा मोठा खुलासा, म्हणाली, “खूप चुका केल्या आणि…”
सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपट यावर्षीच्या मे महिन्यात प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी आदी मुख्य भूमिकेत होते. अवघ्या २० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल ३०० कोटींची कमाई केली होती.