Jui Gadkari Shares Video On Madh Island Traffic : मुंबईतील रस्ते प्रकरणावर सर्वसामान्य नागरिकांसह कलाकार मंडळीही भाष्य करताना दिसतात. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांना ट्राफिकचा, रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागतो. आणि यावर नेहमीच ते बोलताना दिसतात. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीने सततच्या ट्राफिकचा कसा त्रास होत आहे याबाबत भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत मढ आयलँडच्या भीषण रस्त्याचा व्हिडीओ शेअर करत हकीगत दाखविली आहे आणि इतकंच नाहीतर यावर तिने आवाज उठविला आहे.
जुई गडकरीनं, मढ आयलँडच्या भीषण रस्त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात खूप ट्राफिक पाहायला मिळत आहे. त्यामध्ये रुग्णवाहिकासुद्धा अडकली असल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ शेअर करत जुईनं लिहिलं की, “आज न राहवून ही रील पोस्ट करतेय. गेली ३.५ वर्ष मी मढ आयलँड नावाच्या एका अत्यंत वाईट एरियामध्ये शूट करतेय. हो वाईट. कारण, इथे कुठल्याच सुविधा नाहीत. अगदी बेसिक ही नाही. तसं तर हा डिफेन्सचा एरिया आहे. तरीही इतका दुर्लक्षित? गेली ३.५ वर्ष इथे रस्त्याचं काम सुरु आहे. टप्प्या टप्प्यात सुरुच आहे. आरामात सुरु आहे. रोज नवीन खड्डे. रोज नवीन त्रास. त्यात शनिवार-रविवार इथे जत्रा लागते. अक्सा बीचला. ती अक्षरशः ट्राफिकच्या बाबतीत जीवघेणी असते. जर रात्री ही इथे एवढं ट्राफिक लागत असेल तर नक्की काय करावं माणसाने? इथे एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर काय करायचं? आधीच मुंबईतील, ठाण्यातील ट्राफिक कधीही न कमी होणारं आहे. अगदी सगळ्याच मोठ्या सिग्नलला काही ना काही खणलेलं आहेच. हे सगळं पार करून मढला यायचं आणि ट्राफिकमध्ये अडकायचं. हा रोजचा दिनक्रम झालाय आणि आज अगदीच राहवलं नाही म्हणून हे पोस्ट करतेय”.
आणखी वाचा – प्रेमाची चर्चा असणाऱ्या अक्षया-विशालचा साखरपुडा संपन्न, दोघांच्या पारंपरिक लूकनं वेधलं लक्ष, फोटो समोर
पुढे तिने म्हटलं, “माझ्या आधीही बऱ्याच अभिनेत्यांनी अशा स्टोरीज, रील्स केल्यात पण उपयोग शून्य… पावसाळा आला तर अजून वाईट असतं इथलं. मला एक कळत नाहीये १० किलोमीटरचा रस्ता करायला ३.५ वर्ष लागतात? कशाचीच उत्तरं मिळत नाहीयेत ना काही सुधारणा दिसतेय. खूप त्रास देणारा प्रवास झालाय हा. मढ मधून बाहेर पडायला कधी कधी २ तास लागतात आणि त्या पुढे सुरू होतो घरी जायचा प्रवास. आम्ही खरंच यासाठी पात्र आहोत? टॅक्स वेळेत भरा, सगळ्या गोष्टी नीट पाळा, कुठल्याही नियमाचं उल्लंघन न करूनही जर अशी ‘सुविधा’ मिळत असेल तर नक्की करायचं काय सामान्य माणसाने?’ असं म्हणत जुईने सरकारला प्रश्न विचारला आहे.
आणखी वाचा – बॉलिवूड अभिनेत्रीचे व्हॉट्सअप हॅक, अकाऊंटवरुन अश्लील मॅसेज पाठवले आणि…; पोलिसांत तक्रार दाखल
शेवटी जुईने असं म्हटलं आहे की, “मला माहितीये यावर मला अनेक लोक ट्रोल करतील पण एकदा येऊन बघा इथे आणि मग कळेल किती वाईट झालीये परिस्थिती. त्यात एवढ्याशा रस्त्यावरून मोठे ट्रक्स, बसेस ही वाहनं देखील ये-जा करतात. ट्राफिक जाम होणारच आहे. यावर कधी उपाय मिळेल माहित नाही. रस्त्याच्या कामाचं वेग कधी वाढेल माहित नाही”,असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि श्रीकांत शिंदे यांना टॅग करत लवकरात लवकर मदत करण्याची कळकळीची विनंती केली आहे.





