‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या अर्जुन-सायलीच्या बहरलेल्या नात्याला कोणाची तरी नजर लागली असल्याचं चित्र दिसत आहेत. अर्जुन-सायलीमध्ये बहरत जाणाऱ्या प्रेमाला पूर्णविराम मिळत आता त्यांच्यात दुरावा येणार असल्याचा सिक्वेन्स सुरु आहे. मालिकेत अर्जुन-सायलीच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असून त्यांच्यातील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजही काही वेळात संपणार असल्याचं समोर आलं आहे. कॉन्ट्रॅक्ट मरेज संपताच सायली व अर्जुन एकमेकांपासून दूर होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Tharal Tar Mag Serial Update)
लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवून दोघांनी वेगळं व्हायचं आणि त्यानंतर रितसर दोघांचाही कोर्टात घटस्फोट होईल असं अर्जुन-सायलीने आधीच ठरवलेलं असतं. परंतु वर्षभरात त्यांच्यात चांगली मैत्री होते आणि नकळत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवून एकमेकांपासून दूर जाणं दोघांनाही कठीण होऊन बसलं आहे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असून अद्याप त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नाही.
तर एकीकडे अर्जुन व सायलीला त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच सरप्राइज देण्याचं सुभेदार कुटुंबीय ठरवितात.दोघांसाठी ते सरप्राइज प्लॅन करतात. यावेळी सायलीच्या मनात या सगळ्या लोकांची फसवणूक केल्यामुळे दडपण निर्माण होतं. तर, अर्जुन “मिसेस सायलींना माझ्यापासून कधीच वेगळं करू नकोस देवा” अशी इच्छा मागतो. अखेर अर्जुनची इच्छा आता पूर्ण होणार असून मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे.
मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, अर्जुन सायलीला म्हणतो, “बायको मला तुला प्रपोज करायचंय…म्हणजेच मला माझी एक आयडिया तुझ्यासमोर प्रपोज करायची आहे. आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं असलं तरीही केस जिंकेपर्यंत तुम्ही इथेच राहावं असं मला वाटतं”, यावर सायली “हो सर हे मला मान्य आहे”, असं उत्तर त्याला देते. सायलीने सुभेदारांकडे राहायला होकार दिल्यामुळे अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर मनोमनी आपणही इथेच राहणार म्हणून सायलीही खुश असते.