‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. मालिकेत सध्या साक्षी व चैतन्यच्या साखरपुड्याची धामधूम पाहायला मिळत आहे. चैतन्य सुभेदार कुटुंबालाही साखरपुड्याचं आमंत्रण देतो. एक कुटुंब म्हणून सुभेदार कुटुंबाने नेहमीच चैतन्यच्या सुख-दुःखात साथ दिलेली असते. (Tharal Tar Mag Promo)
अर्जुन व चैतन्यच्या वादानंतरही सुभेदार कुटुंब चैतन्यच्या सुखात सहभागी होतात. संपूर्ण सुभेदार कुटुंब चैतन्य व साक्षीच्या साखरपुड्याला येतात. ते पाहून साक्षीला धक्का बसतो तर चैतन्य खूप खुश होतो. तर सायली व अर्जुनला पाहून साक्षी व चैतन्य चकित होतात. अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. बरेच दिवसांपासून अर्जुन व सायलीला साक्षीचा खरा चेहरा चैतन्यसमोर आणायचा असतो, मात्र चैतन्य त्यांचं काहीच ऐकून घेत नसतो. तो साक्षीच्या प्रेमात आंधळा झालेला असतो. मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये सायली व अर्जुन संधी साधून साक्षीचा खरा चेहरा त्याच्यासमोर आणतात.
अर्जुन चैतन्यला साक्षी व कुणालचे काही फोटो व त्यांचे प्रेमपत्र दाखवतो. ते पाहून चैतन्यच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुन कुणालच्या हातात ते फोटो देत म्हणतो, “कुणालचा मृत्यू हा साक्षीमुळे झाला आहे”. ते फोटो आणि अर्जुनच बोलणं ऐकून चैतन्यला खूप मोठा धक्का बसतो. आणि तो अर्जुन व साक्षीला म्हणतो, “म्हणजे साक्षी नाटक करतेय”. हे बोलून चैतन्य खूप खचतो तेव्हा अर्जुन चैतन्यला आवाज देत त्याला धीर देतो. चैतन्यला रडू येत तेव्हा अर्जुन चैतन्यला घट्ट अशी मिठी मारतो. आणि त्याला जवळ घेत त्याला आधार देतो.
त्यानंतर चैतन्य म्हणतो, “मी आताच्या आता हा साखरपुडा मोडतोय”, असं म्हणून जायला निघतो तेव्हा सायली थांबा चैतन्य सर असं म्हणून चैतन्यला अडवते. त्यांनतर अर्जुन चैतन्यला म्हणतो, “या नाटकाची सुरुवात साक्षीने केली होती पण या नाटकाचा शेवट आपण करायचा”, असं म्हणत सायली, अर्जुन व चैतन्य एकमेकांच्या हातात हात देत ‘ठरलं तर मग’ असं बोलतात. आता सायली, अर्जुन, चैतन्य मिळून साक्षीला धडा शिकवणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.