‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेला प्रेक्षकांनी आतापर्यंत भरभरून प्रेम दिलं. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आहे. गौरी व जयदीपचा पुनर्जन्म झाला आहे आणि मालिकेतील खलनायिका शालिनी शिर्के-पाटील तब्बल २४ वर्षांनी कोल्हापुरात परतली आहे. त्यामुळे आता मालिकेमध्ये काय पाहायला मिळणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिका यशाच्या शिखरावर असताना अभिनेता मयुर पवारने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या दिग्दर्शकाची कधीही न पाहिलेली बाजू प्रेक्षकांपर्यंत मयुरने पोहोचवली आहे. (mayur pawar on chandrkant kanase)
सध्या या मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. चंद्रकांत हे हातात वॉकर घेऊन सेटवर काम करताना दिसत आहेत. सदर व्हिडीओबरोबर मयूरने एक भलीमोठी पोस्टदेखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, “नमस्कार. या लेखातील भावना संपूर्ण ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या टीमच्या आहेत. या लाडक्या मालिकेचे दिग्दर्शन श्री. चंद्रकांत कणसे सर करत आहेत. खरतर चंदू सरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. मागच्या महिन्यात चित्रीकरण संपवून घरी जात असताना चंदू सरांचा अपघात झाला. त्यानंतर सरांना चार महिने सक्तीचा आराम सांगितला होता. चंदू सर हे कामाप्रती खूप निष्ठावान आहेत. सेटवर कधीही ते बसत नाहीत. सतत काम करत असतात. सीन कसा चांगला होईल किंवा लिहून आलेल्या सीनमध्ये काय बदल करु शकतो या विचारात ते येरझाऱ्या घालत असतात. आम्ही त्यांना फक्त जेवणाच्या वेळेत शांत बसलेले पाहिले आहे. अन्यथा ते कधीही शांत बसत नाहीत. आराम करण्याचे चार आठवडे पूर्ण होत आले तशी त्यांची कामाची तळमळ वाढू लागली. ते सतत सेटवर फोन करुन सीन कसा केला पाहिजे याबद्दल सह-दिग्दर्शक शशी सरांशी चर्चा करत असत”.
तसेच मयूर पुढे लिहितो की, “चंदू सरांच्या अनुपस्थितीत शशी सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने सेट हाताळला. या दरम्याने एक महत्त्वाचा प्रोमो शूट करायचा होता. हे जेव्हा चंदू सरांना समजले तेव्हा त्यांना राहवेना. काहीही झालं तरीही हा प्रोमो आपणच शूट करायचा असं चंदू सरांनी ठरवलं आणि मी येतोय असं चंदू सरांनी फोन करुन सांगितलं. कामाप्रती त्यांचे असलेले प्रेम आणि निष्ठा त्यांना सेटवर घेऊन आली. सर सेटवर येताच सर्वचजण कमालीचे खुश झाले आणि एक चैतन्य निर्माण झाले. सरांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली. दिग्दर्शकाची इतकी काळजी घेणारी टीम खूपच कमी पाहायला मिळते”.
पुढे मयूरने म्हटलं की, “चंदू सरांनी इतर कोणताही विचार न करता सेटवर येऊन प्रोमो दिग्दर्शित केला आणि नेहमीप्रमाणे कमाल झाली! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ याची खऱ्या अर्थाने प्रचिती आली. आमच्या मालिकेच्या पूर्ण टीमला खूप प्रेम! चंदू सर लवकरात लवकर बरे व्हा. खूप काम करायंच आहे. बाकी तुमच्या आशिर्वादानं आणि आपल्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नाने आपला टीआरपी वाढतच आहे, तो असाच वाढत राहो आणि लवकरात लवकर पुन्हा तुम्हाला सेटवर त्याच उत्साहात बघायला मिळो, ही नटराजचरणी प्रार्थना! तुम्ही ग्रेट आहात हे सांगायची गरजच नाही. लव्ह यू सर!” मयूरच्या या पोस्टवर अनेकांनी चंद्रकांत यांच्या जिद्दीला सलाम केला आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छाही देण्यात येत आहेत.