‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या कथानकाच्या आणि कलाकारांनी मालिकेची उंची वाढविली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेत आलेल्या टर्न अँड ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. (Tharal Tar Mag Serial Update)
सध्या मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत महिपतने आखलेला डाव त्याच्यावरच पलटला आहे. मालिकेत महीपतने सायली विरोधात कट रचलेला असतो. सायलीला त्याने किडनॅप केलेलं असतं. मात्र सायली महिपतच्या तावडीतून सुटून बाहेर येते. सायलीजवळ असलेलं पुराव्यांचं पेन ड्राइव्हसाठी हा सर्व खटाटोप सुरु असतो. सायलीला वाचवून अर्जुन घरातल्यांशी खोटं बोलतो. सायली मंदिरापाठी चक्कर येऊन पडल्याचं तो यावेळी सांगतो. एवढा कडेकोट बंदोबस्त करूनही सायली आपल्या माणसांच्या तावडीतून सुटली कशी हा प्रश्न साक्षीला आणि महिपतला पडतो.
अर्जुन सायलीची काळजी घेताना दिसतो. तो तिचे पाय दाबून देतो. त्यानंतर तो सायलीला ती मार्केटमध्ये गेल्यापासूनचा सर्व घटनाक्रम विचारतो. पण सायली बोलता बोलता झोपते. सायलीला असं शांत आपल्या शेजारी झोपलेल पाहून अर्जुनला बरं वाटत असतं. गुंडांच्या तावडीतून सोडवल्यावर सायलीने मारलेली मिठी ही भीतीची होती की प्रेमाची असा प्रश्न त्याला पडलेला असतो. कॉन्ट्रॅक्टनुसार सायली एका वर्षांनी आपल्याला सोडून जाईल याचीही त्याला भीती वाटत असते.
त्यानंतर सायली अर्जुनला तिच्याबरोबर घडलेली सर्व घटना सांगते. तसेच संतोषने आपल्याला महिपत विरोधात पुरावे दिल्याचे देखील सांगते. त्यानंतर सायलीने तो पेन ड्राईव्ह गाडीत लपवला असल्याचं आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये तिने डोकं लावून पेन ड्राईव्ह सुरक्षित ठेवला हे जाणल्यानंतर अर्जुन तिच्यावर खूप खुश होतो आणि तिचा हात हातात घेऊन तिचे आभार मानत असतो.