स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली सव्वाचार वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका आजही प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवत आहे. बरेचदा कथानकामुळे या मालिकेला नेटकऱ्यांच्या तावडीत यावं लागलं. तर काहीवेळा प्रेक्षकांनीचं या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं. अशातच ही मालिका बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेली पाहायला मिळत होती. मालिकेत अरुंधतीचा नवरा आशुतोषचा मृत्यू होणार असल्याचा प्रोमो समोर आला होता. (Aai Kuthe Kay Karte Troll)
हा वाईट प्रोमो समोर येताच प्रेक्षकांनी नाराजी दाखवायला सुरुवात केली. तर एकीकडे स्टार प्रवाह वाहिनीने मालिका आता नव्या प्रवासात वाटचाल करताना दिसणार असल्याचं म्हटलं. दरम्यान मालिकेचा नवा प्रोमो नुकताच स्टार प्रवाह वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर केला. यांत आशुतोषच्या मृत्यू झाल्यानंतर अरुंधतीची अवस्था वाईट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
आशुतोषच्या मृत बॉडीकडे अरुंधती एकटक पाहत असताना यश तिला सावरताना दिसत आहे. शिवाय अरुंधतीच्या डोक्यालाही मार लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर यश अरुंधतीला सावरत घरी घेऊन जातो, तिकडे अनिश असतो. तो देखील अरुंधतीची अवस्था पाहून घाबरतो. त्यानंतर यश अरुंधतीला मलमपट्टी करताना दिसत आहे. तर अनिश अरुंधतीसाठी हळदीचं दूध घेऊन येतो. मालिकेत दाखवण्यात आलेलं हे कथानक पाहून मालिकेला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
हा प्रोमो पाहून एका नेटकऱ्याने, “प्लिज नका दाखवू हे सगळं” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, “माणूस मेला आणि दूध पाजताय, काही कस दाखवताय”, असं म्हटलं आहे. प्रोमो पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला असून नेटकरी वायफळ कथानक दाखवण्यावरुन मालिकेला बोल लगावत आहेत.