गेल्या काही वर्षांमध्ये टीव्ही इंडस्ट्रीची एकूणच गणितं बदलताना दिसत आहेत. मालिकांच्या कथा, पात्र, कलाकार सगळ्याचीच चमक-धमक अगदी वेगळीच दिसते. काही वर्षांपूर्वी सासू-सूनांचा ड्रामा मालिकांमध्ये तुफान चालत होता. आताही त्याच कथा पण एका नव्या स्वरुपात पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने टेलिव्हीजन विश्वामध्ये रिएलिटी शोची एक वेगळीच लाट आली. यामध्ये डान्स, गायन अशा विविध रिएलिशी शोजनी प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. काही वर्ष सगळं छान आणि उत्तम वाटत असतानाच वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या. रिएलिटी शो स्क्रिप्टेड असतात असं बोललं जाऊ लागलं. काही अंशी ते खरंही असल्याचं समोर आलं. याचबाबत आता गायक राहुल वैद्यने भाष्य केलं आहे. (Rahul Vaidya on reality shows)
‘इंडियन आयडल’ या रिएलिटी शोमुळे राहुल वैद्य नावारुपाला आला. राहुलच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. आताचे सगळेच रिएलिटी शो स्क्रिप्टेड असल्याचा दावा त्याने केला आहे. आपण गरीब आहोत असं सांगत टीआरपी वाढवायचा, वोट मिळवायचे हेच रिएलिटी शोचं सत्य असल्याचं राहुलचं म्हणणं आहे. याचबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अगदी उघडपणे भाष्य केलं.
राहुलने रिएलिटी शोबाबत सांगितलं की, “रिएलिटी शो आता स्क्रिप्टेड झाले आहेत. प्रत्येक शोचा एक पॅटर्नच आहे. एक त्यामध्ये लव्ह अँगल असतो. कोणाची तरी आई कोणाच्या तरी घरी घरकाम करत असते. कोणाचे तरी वडील ऑटो चालवत असतात. यामधलं काहीच नसेल तर असंच बोला तसंच बोला असं सांगितलं जातं. पण पहिलं असं काहीच नव्हतं”.
आणखी वाचा – आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी करतेय शूट, नेहमी सलाईन लावते अन्…; स्वतःच सांगितली परिस्थिती
“मी गरीब आहे असं बोलून जर लोक वोट करत असतील आणि हे मला आधीच माहिती असतं तर मी तेच केलं असतं. पण तेव्हा सगळं काही खरं होतं. पण आताचे गायनाचे रिएलिटी शो खरेच आहेत हे ठामपणे मी सांगू शकत नाही”. ‘इंडियन आयडल’च्य पहिल्या पर्वाचा राहुल स्पर्धक आहे. या शोमधूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर बरीच वर्ष तो इंडस्ट्रीमध्ये फारसा दिसला नाही. ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याचं आयुष्य पुन्हा बदललं.