गेले काही दिवस बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मुंबईत अगदी थाटामाटात सोनाक्षी सिन्हाने बॉयफ्रेंड झहीर इक्बाल यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते.
जवळपास सात वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, दोघांसाठी हा निर्णय सोपा नव्हता. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा धर्म. सोनाक्षी व झहीर दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते. सोनाक्षी सिन्हा हिंदू आहे, तर झहीर हा मुस्लिम आहे. त्यामुळे दोघे त्यांच्या धर्मावरुन अनेकदा चर्चेत आले आहेत. सोनाक्षी सिन्हाने झहीरबरोबर लग्न केल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
सोनाक्षी सिन्हा व इाहीर इक्बाल यांना ट्रोल करणाऱ्यांना सोनाक्षीचे वडील व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न म्हणाले की, “आनंद बक्षी साहेबांनी अशा व्यावसायिक आंदोलकांबद्दल लिहिले आहे, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’ त्यात मी जोडू इच्छितो की, ट्रोल करणारे लोक बिनकामाचे आहेत की त्यांना इतरांना बोलण्याव्यतिरिक्त काहीच काम नाही. माझ्या मुलीने काहीही बेकायदेशीर किंवा असंवैधानिक केलेले नाही.”
आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी ३’मधून पहिल्याच आठवड्यात एक स्पर्धक घराबाहेर पडणार, कोणाची एक्झिट होणार?
यापुढे ते असं म्हणाले की, “लग्न हा दोन व्यक्तींचा वैयक्तिक निर्णय आहे: यावर कोणाला हस्तक्षेप करण्याचा किंवा भाष्य करण्याचा अधिकार नाही. मी सर्व आंदोलकांना सांगतो की, जा. तुम्ही तुमचे जीवन जगा. तुमच्या जीवनात उपयुक्त असे काहीतरी करा. बाकी मला काहीच बोलायचे नाही.”
दरम्यान, सोनाक्षी व झहीर यांचे लग्न पार पडल्यानंतर सोनाक्षीला धमक्या येत आहेत. अभिनेत्रीविरोधात धमकीच्या पोस्ट शेअर करण्यात आल्या. सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल झाली होती, ज्याद्वारे अभिनेत्रीला धमकी देण्यात आली होती. तसेच यात सोनाक्षीला बिहारमध्ये येऊ दिले जाणार नाही, असे लिहिले होते.