बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपत्रसृष्टीमध्ये राहून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यातील एक नाव म्हणजे फरीदा जलाल. फरीदा जलाल यांनी आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १४ मार्च १९४९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्या आता ७४ वर्षांच्या आहेत. अभिनेत्री, सहाय्यक अभिनेत्री, आई अशा अनेक भूमिकांमध्ये त्या दिसल्या आहेत. पण गेल्या काही काळापासून त्या चित्रपटसृष्टीपासून लांब असलेल्या पाहायला मिळत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया. (actress Farida Jalal)
फिल्मफेअरच्या ‘युनायटेड फिल्म प्रोड्यूसर्स टॅलेंट हंट’ या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्याबरोबर दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांनीही सहभाग घेतला होता. पुरुषांमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता तर महिलांमध्ये फरीदा पहिल्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांना ताराचंद बडजात्या यांची ‘तकदीर’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर दिलीप कुमार, राजेश खन्ना यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांना राजेश खन्ना यांच्याबरोबर ‘आराधना’ या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटांमध्ये त्यांनी राजेश खन्ना यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.
अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेत्री, सह-अभिनेत्री व आई या भूमिकांमध्ये त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. १९९२ पासून त्यांनी आई ही पात्र साकारण्यास सुरवात केली. ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका केली आहे. कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘डुप्लीकेट’, ‘दिल तो पागल है’ अशा अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये त्यांनी शाहरुख खानच्या आई किंवा सासूची भूमिका केली आहे.या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे.
फरीदा यांना ‘मम्मो’या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर २००३ पासून त्यांनी लहन पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. ‘शरारत’ या मालिकेमध्ये त्या मुख्य भूमिकेमध्ये दिसून आल्या. त्यानंतर २००८ मध्ये पंजाबी चित्रपट ‘यारिया’मध्येही काम केले आहे. प्रसिद्ध मालिका ‘बालिका वधू’ या मालिकेतही त्या दिसून आल्या होत्या.
१९७८ मध्ये त्यांनी तबरेज बरमवार यांच्याबरोबर लग्न केले. पण २००३ साली त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना यासीन नावाचा मुलगा आहे.