Sayali Sanjeev On Politics : अनेक अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर कलाविश्वाबरोबरच राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने लवकरच राजकारणात येणार असल्याचं भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून सायली संजीव घराघरांत पोहोचली. आजवर सायलीने अनेक मालिका आणि चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मन जिंकली आहेत. काही वर्षांपूर्वी सायलीने पॉलिटिकल सायन्सचे शिक्षण घेतले होते, तेव्हापासून अभिनेत्रीला राजकीय आवड असल्याचं समोर आलं. आता या शिक्षणाचा ती खऱ्या आयुष्यात अवलंब करणार असल्याचं समोर आलं आहे.
सायली संजीवने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’च्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीदरम्यान सायलीला ती राजकारणात एन्ट्री करणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सायली म्हणाली, “मला सक्रीय राजकारणात सहभागी होऊन काम करायचं आहे. मी जेव्हा राजकारणात येईन तेव्हा काही गोष्टी कदाचित बदललेल्या असतील. त्यामुळे मला आज ज्या समस्या आहेत त्याकडे बघून मी माझं तेव्हाचं ध्येय ठरवलं, तर त्याचा आता काय फायदा होणार नाही. तेव्हा त्याचा तसा संबंध नसेल. मला लहानपणापासून वाटतं की, इथे घाण आहे, हा रस्ता खराब आहे, इथे पाणी नाही किंवा वीज नाही. काही ठिकाणी खड्डे तर आहेतच, पण साधा रस्तासुद्धा नाही. तर याबद्दल आपण सतत तक्रारी करण्यापेक्षा मला असं वाटतं की, आपण ते करुन बघू आणि जर ते आपल्याला जमलं तरच आपल्याला दुसऱ्यांना नावं ठेवण्याचा हक्क आहे”.
आणखी वाचा – विवेक लागू यांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडून गेली लेक, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “बराच काळ एकत्र लढलो…”
पुढे ती म्हणाली, “जर आपल्याला जमलं नाही तर ते काम खूप अवघड आहे. मला वाटतं की, आपण प्रयत्न करुन बघायला हवा. छान रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, स्वच्छता हवी, प्लॅस्टिक नको हे सगळं करण्यासाठी काय मेहनत लागते हे आपणही पाहायला हवं. म्हणजे फक्त व्यवस्थेला आणि शासनाला नावं ठेवण्यापेक्षा त्यात उतरुन काय काय करावं लागतं हे पाहण्याची गरज आहे. आपण जोपर्यंत ते काम करुन बघत नाही. तोपर्यंत आपण दुसऱ्यांना नावं ठेवू नयेत”.
पुढे सायली तिचं मत व्यक्त करत म्हणाली, “जर मी कचरा केला आणि तो कचरा खिशात ठेवून पुन्हा घरी येऊन कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासाठी काय मेहनत आणि शिस्त असावी लागते हे मला माहीत आहे. हीच शिस्त सगळ्यांमध्ये येण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार आधी करावा. नवीन मुलांनी राजकारणाचा करिअर म्हणून विचार केला तर हे खूप उत्तम करिअर आहे. आपल्या पिढीतल्या सगळ्यांना आपलं शहर, आपलं राज्य, आपला देश चांगला दिसायला हवा असेल, तर आपल्यासारख्या तरुण पिढीला यात उतरण्याची गरज आहे. हा अभ्यास फार सुंदर आहे”.





