सैराट… मराठी मनोरंजन विश्वातील खऱ्या मैलाचा दगड ठरलेला या चित्रपटाने मराठीसह बॉलिवूडला वेड लावले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने अक्षरश; सर्वांनाच वेड लावले. आजही या चित्रपटाची क्रेझ काही कामी झालेली दिसून येत नाही. ‘सैराट’च्या कथानकासह त्यातील गाणी व कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. २९ एप्रिल २०१६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि आज या चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘सैराट’मध्ये नागराज मंजुळे यांनी नवख्या चेहऱ्यांना संधी देत रुपेरी पडद्यावर आणले होते.
‘सैराट’मधील आर्ची, परशा म्हणजेच रिंकु राजगुरु व आकाश ठोसर या मुख्य कलाकारांसह इतर पात्रही चांगलीच गाजली होती. आर्चीची मैत्रीण आनी, परशाचे मित्र सल्या-बाळ्या व आर्चीचा भाऊ प्रिन्स हे कलाकारदेखील चांगलेच चर्चेत आले होते. नागराज मंजुळेंनी ‘सैराट’मध्ये कोणत्याही स्टार कलाकाराला न घेता नव्यानवख्या कलाकारांना घेत त्यांना लोकप्रियता व प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र हे कलाकार आता काय करतात? हे माहीत आहे का?
‘सैराट’मध्ये “परशा आर्ची आली रे आली” असं म्हणणाऱ्या लंगड्या म्हणजेच तानाजी गालगुंडेने ‘सैराट’नंतर अनेक चित्रपटांत छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सैराटनंतर ‘मुसंडी’, ‘अगडबम’ व ‘झुंड’मध्येही मुख्य व महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. नुकतीच त्याने ‘नवरदेव बी.एस.सी.अॅग्री’ या चित्रपटातही मुख्य भूमिका केली होती.
तानाजीबरोबर असलेला परशाचा दूसरा मित्र म्हणजे सल्या म्हणजेच अरबाज शेख. अरबाज व तानाजी हे आजही चांगले मित्र आहेत. अरबाजने ‘सैराट’नंतर ‘फ्री हीट दणका’, ‘गस्त’, ‘बस्ता’ या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. नुकतीच त्याने मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटातदेखील महत्त्वाची भूमिका साकारली.
या चित्रपटाचा खलनयाक म्हणजेच प्रिन्स फेम अभिनेता सूरज पवारनेही ‘सैराट’नंतर काही चित्रपटांत मुख्य भूमिका साकारल्या. ‘बस्ता’, ‘घर बंदूक, बिर्याणी’ या चित्रपटांत त्याने काही भूमिका करत प्रेक्षकांचे मन जिंकले होते. काही दिवसांपूर्वी हा अभिनेता एका फसवणुकीच्या आरोपामुळेही चर्चेत आला होता.
‘सैराट’मधील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकु राजगुरुने ‘सैराट’नंतर अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका साकारल्या. याचसह तिने ओटीटी विश्वातदेखील पदार्पण केले. ‘कागर’, ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘मेकअप’ आदी चित्रपटांत तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच रिंकु ‘झिम्मा २’ या चित्रपटात झळकली होती. यातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
तर ‘सैराट’मधील परशाने ‘घर बंदूक बिर्याणी’ व ‘झुंड’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर तो लवकरच ‘बाल शिवाजी’ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याच्या या आगामी भूमिकेसाठी त्याचे अनेक चाहते वाट पाहत आहेत.